फलटण, (प्रतिनिधी) :
हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि झपाट्याने कमी होत चाललेले हरित क्षेत्र ही आजची गंभीर जागतिक चिंता असताना, महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने फलटणमध्ये सुरू केलेला ‘अटल आनंद घनवन’ प्रकल्प पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने आशादायी आणि दूरगामी पाऊल ठरणार आहे, असे वनपरिक्षेत्रपाल निकिता बोटेकर यांनी सांगितले.
वन विभागाच्या कार्यालयालगत सुमारे १.५ हेक्टर क्षेत्रात ४५ हजार देशी वृक्षांची लागवड करून जैवविविधतेने समृद्ध घनवन उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. फलटणमधील पत्रकार आणि सामाजिक संस्थांच्या प्रमुखांच्या हस्ते वृक्षारोपण करून या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोटेकर बोलत होत्या.
बोटेकर म्हणाल्या की, ‘अटल आनंद घनवन’ हा फलटणच्या पर्यावरण इतिहासातील हरित पर्वाची नवी सुरुवात ठरणार आहे. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते; मात्र संगोपनाअभावी अनेक रोपे नष्ट होतात. या प्रकल्पात प्रत्येक रोपाचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली असून, लावलेले प्रत्येक रोप मोठे वृक्ष बनावे, यासाठी वन विभाग विशेष प्रयत्न करणार आहे.
देशी वृक्षप्रजातींमुळे जैवविविधतेचे संवर्धन, भूजल पातळीत वाढ, मृदसंवर्धन, तापमान नियंत्रण, स्वच्छ हवा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यात हा परिसर पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांसाठी निसर्ग अभ्यासाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचाही वन विभागाचा मानस आहे.
दाट घनवनामुळे पक्षी, फुलपाखरे, मधमाशा तसेच विविध वन्यजीवांना सुरक्षित अधिवास उपलब्ध होतो. त्यातून नैसर्गिक अन्नसाखळी मजबूत होऊन परिसंस्थेचा समतोल राखण्यास मदत होते. तसेच मोठ्या प्रमाणात कार्बन शोषला जात असल्याने हवामान बदलाच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठीही या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होते.
फलटण परिसरातील पर्यावरण अधिक समृद्ध करण्याबरोबरच भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘अटल आनंद घनवन’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमास वनपाल नितीन जगदळे, वनरक्षक अर्चना लोखंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

















