फलटण प्रतिनिधी :
फलटण तालुक्यावर वरुणराजाची अवकृपा राहिल्याने तालुक्यात पाण्यासह जानावरांच्या चाऱ्याचे दुर्भिक्ष्य वाढले आहे. अशातच फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी फलटण तालुक्यातील 42 गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्यामुळे प्रशासनाचीही चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांची दमछाक होत आहे. मात्र जावली सारख्या गावावर दुर्लक्ष केल्यामुळे जनतेतून पाणी व चाऱ्यासाठी टाहो फोडला जातोय.
पाळीव जनावरांना चारा व घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जनावरांना थोडा पाण्याचा ओलावा किंवा पाण्याचे तळे दिसले तरी तहान भागविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. जावली भागात माणसांना वेळेवर पाणी मिळत नाही तर जनावरांना कुठून मिळणार, असे चित्र आहे. जावली ग्रामपंचायतअंतर्गत एकूण 9 ते 10 वस्त्या येतात. त्यामध्ये पडरवस्ती, ठोंबरेवस्ती, बामनाचामळा,पोकळेमळा, शेवतेमळा, गोफनेमळा, हेकळवाडी, मांडवखडक येथे मोठ्या प्रमाणात तीव्र पाणीटंचाई भासत आहे.
ग्रामपंचायतच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीमधून केला जाणारा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे त्यामुळे जनावरांसाठी किंबहुना वापरासाठीचे पाणी खाजगी टँकर मधून विकत घेतले जाऊ लागले आहे.
जावली सह परिसरातील पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई सदृश्य परिस्थिती परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामपंचायतच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीमध्ये कमी पाणी साठा उपलब्ध आहे.त्यामुळे धोम बलकवडी कॅनाॅलला पाणी सोडण्याची मागणी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडे 1 फेब्रुवारीला निवेदनाद्वारे करण्यात आली होती, तरीही प्रशासनाने डोळे झाक केल्यामुळे जावलीकरांवर चारा व पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले असल्याचे जावतील ग्रामस्थांनी सांगितले.