फलटण | धैर्य टाईम्स | १० जानेवारी २०२४
गिरवी येथील एका पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारले सदर प्रकरणी फलटण वन विभाग यांना कळवूनही फलटण विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी अथवा कर्मचाऱ्यांनी संबंधित घटनास्थळी भेट दिली नसून वन विभागाचे अधिकारी गांधारीच्या भूमिकेत आहेत की काय अशी चर्चा आता फलटण तालुक्यात होऊ लागली आहे. तर गिरवी ग्रामस्थांमध्ये फलटण वन विभागाच्या विरोधात प्रचंड नाराजीचा नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गिरवी ता. फलटण येथे दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री काही ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी बिबट्या दिसला होता त्याबाबत सबंधित ग्रामस्थांनी त्यांचे मोबाईल फोन मध्ये चित्रीकरण केले होते. तदनंतर गिरवी येथील विकास विजयसिंह कदम यांचे तीन वर्ष वयाचा कारवानी जातीचा पाळीव कुत्रा याच्यावर दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी रात्री दहा वाजण्याचे सुमारास बिबट्यांनी हल्ला करून ठार मारले. सदर कुत्रा आठ फूट ओंडक्याला बांधलेला असतानाही ओंडक्यासह कुत्रा जवळपास १०० फूट लांब ओढत नेऊन त्याला बिबट्यांनी मारून खाल्ले.
झालेल्या हल्ल्याच्या प्रकारासंदर्भात विकास विजयसिंह कदम यांनी फलटण वन विभागाशी संपर्क साधून घडलेला प्रसंग सांगितला तसेच बिबट्यांचां गावच्या व वाड्या वस्ती नजिक लोकवस्तीलगतच्या वावरामुळे दहशतीचे वातावरण झाले असून बिबट्यांचा बंदोबस्त करून त्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा ही विनंती फलटण वन विभाग यांच्याकडे केली पण वन विभागाकडून कडून उडवा उडवी चे उत्तर मिळाले.
"कुत्रा हा बिबट्यांचे खाद्य असून कुठल्या माणसाला काही इजा तर झालेली नाहीना किंवा बिबट्याने कुठल्या माणसांवरती हल्ला केलेला नाही त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही" असं सांगण्यात आले तरी माणसावरती हल्ला झाला असल्यास सांगा असा उलट प्रश्न फलटण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला. फलटण वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली नाही तसेच पंचनामा देखील केला गेला नाही.
लोकवस्ती लगत बिबट्या कडून हल्ला होत असल्याने फलटण वन विभाग यांनी भेट देऊन ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्याची आवश्यकता असताना फलटण वन विभाग मनुष्यहानी होण्याची वाट बघत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला असून सदर प्रकरणी जिल्हा वन अधिकारी यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता असून गिरवी येथील हल्ल्या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या फलटण वन विभागाचे अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भविष्यात फलटण वन विभागाच्या दुर्लक्षामुळे जीवित हानी झाल्यास फलटण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. समस्त गिरवी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या दहशतीचे वातावरण असून बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.