मौजे सासकल(हुरा) येथे सातारा जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग फलटण यांच्यामार्फत बांधण्यात आलेल्या पाणी साठवण बंधाऱ्याला गळती लागली असल्याने शासनाचे १४.३३ लक्ष पाण्यात गेल्याची भावना ग्रामस्थांची झाली आहे. सदर काम हे लेखाशिर्ष ५ लघु पाटबंधारे को.प.कामे (२७०२-५३६७-३१)असे असून कामाचे नाव - मौजे सासकल(हुरा) ता.फलटण येथे साठवण बंधारा बांधणे असे असून हे काम दिनांक १७/०२/२०२१ मंजूर झाले होते. तर प्रत्यक्ष काम दिनांक २८/२/२०२२ रोजी सुरु झाले व दिनांक १६/०३/२०२२ रोजी पूर्ण झाले आहे.या कामाचा अंदाजपत्रकीय खर्च १९.७४ लक्ष(२०२१-२०२२) होता मात्र प्रत्यक्षात १४.३३ लक्ष रक्कम खर्च झाली आहे. सदर कामाचे मक्तेदार अक्षय सुरेश कदम हे आहेत. सदर काम सुरु असताना सासकल ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, इतर पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम शासकीय निकषाप्रमाणे करण्याच्या सूचना देणे अपेक्षित असताना कोणतीही काळजी घेतली नाही. त्यामुळे काही आर्थिक तडजोडी झाल्या की काय? अशी शंका ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे.
सदर काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून हा बंधारा झाल्यापासूनच या बंधाऱ्याला गळती लागली आहे. त्यामुळे येणारे सर्व पाणी वाहून जात असल्याने नागरिकांना या बंधाऱ्याचा कोणताही फायदा होत नसल्याने नागरिक संतापलेले आहेत.त्यांनी पावसाळ्यापूर्वी सदर बंधाऱ्याची गळती काढण्याची मागणी केली असून निकृष्ठ दर्जाचे काम करणारे अक्षय सुरेश कदम या मक्तेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.