फलटण प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील वाहन चालकांनी आपले वाहने चालवताना दुचाकीस्वरांनी हेल्मेट तर चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा असे आवाहन समीर शेख,सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी एका निवेदणाद्वारे केले आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी मार्च २०२२ मध्ये हेल्मेट सक्तीचे परिपत्रक काढलेले असून केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ या कायदयान्यये हेल्मेट व सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आलेले असताना बरेचसे नागरीक अजून देखील हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत असून रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहन अपघातात मृत्यू पावल्यानंतर इन्शुरन्स कंपनी देखील अपघातावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते का? किंवा चारचाकी चालकाने सीटबेल्ट लावला होता का? याची पडताळणी करीत असते. त्यामुळे हेल्मेट व सीटबेल्ट घातल्यास आपला जीव वाचविता येईल तसेच इन्शुरन्स करीता क्लेम करणे देखील सोईचे होईल. तसेच अपघातामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाणेस दाखल होणाऱ्या प्रथम खबरी अहवालामध्ये हेल्मेट व सीटबेल्टचा वापर केला असल्यास तशी नोंद घेण्यात येत असते, त्यामुळे अपघातग्रस्तांना इन्शुरन्स कंपनीकडून क्लेम मिळणे सोईचे होते असे निवेदनात म्हटले आहे.
तरी सातारा जिल्हयातील वाहन चालकांनी दुचाकी चालवताना हेल्मेट व चारचाकी चालवताना सीटबेल्टचा वापर करावा असे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, यांनी निवेदनात म्हटले आहे.