कल्याण - कल्याण पूर्वच्या टाटा पॉवर, येथील देशमुख होम्स परिसरातील अनेक नागरिक गेले अनेक दिवसापासून भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहेत. यासंदर्भात तेथील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली,स्थानिक खासदारानाही ही बाब निदर्शनास आणून देऊन लक्ष घालण्याची विनंती केली आहे. मात्र कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे या भागातील तमाम नागरिकांना ऐन पावसाळ्यामध्ये कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाला शेकडो निवेदनेही दिली आहेत परंतु प्रशासन तेथील नागरिकांच्या सहन शक्तीचा अंत पाहत आहे असे स्थानिकांनी सांगितले. पाण्याच्या समस्येमुळे येथील अनेक नागरिकांनी तेथील घरे भाड्याने देऊन इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे, वेळोवेळी महानगर पालिकेच्या बिलांचा भरणा करून देखील येथील नागरिकांना सतत पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेचे पाणी विभागाचे येथील वार्डचे अभियंता श्री. राणे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, मुंबईवरून मशीन मागवून त्या लाईनची गळती कुठे होत आहे, किंवा काय समस्या आहे हे शोधण्याचे काम चालू आहे, काही तासात पाणी पुरवठा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. मात्र या पाणी समस्येवर कायमचा तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.