दोन वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर येत असलेल्या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणकर आतुर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेली दोन वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यावर निर्बंध आले होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने पालखी सोहळ्याचे उत्साहात पंढरीकडे प्रस्थान झाले आहे.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि . १ व २ जुलै रोजी फलटण शहरात दोन दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे . वारकऱ्यांच्या व पालखी सोहळ्याच्या नियोजनाची फलटण नगरपरिषद व प्रशासनाने जय्यत तयारी केली असून स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, व आरोग्य सेवा देण्यासाठी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले असून संपूर्ण विमानतळ परिसर स्वच्छ केला आहे.
दोन वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर येत असलेल्या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणकर आतुर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेली दोन वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यावर निर्बंध आले होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने पालखी सोहळ्याचे उत्साहात पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले प्रमाणे नियम पाळण्यात यावेत, असे आवाहन फलटण पालिकेने केले आहे.
फलटण शहर उपविभागाकडून पालखी मुक्काम काळामध्ये विद्युत पुरवठा अखंडीत राहण्यासाठी तसेच कोणताही अपघात होऊ नये म्हणून विविध कामे प्राधान्याने करण्यात आली आहेत. उच्चदाब व लघुदाब वाहीनीस अडथळा करणाऱ्या विविध ठिकाणच्या झाडांच्या फांद्या काढण्यात आल्या आहेत. सर्वच रोहित्रांचे बॉक्स दुरुस्त करण्यात आले आहेत. पालखी मुक्कामाच्या दिवशी वारकऱ्यांना मोफत तात्पुरत्या स्वरूपात विज जोडणी देण्यासाठी पोलवरतीच स्विच बोर्ड, जनसेट बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळ येथे माऊली मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची विज जोडणी देण्यात आली आहे. विद्युत सुरक्षिततेच्या कारणास्तव पालखी ज्या मार्गाने येणार आहे त्या मार्गावर विविध ठिकाणी सुरक्षा फलक देखील लावण्यात आले आहेत. पालखी मुक्कामा दिवशी पुर्णवेळ ११० कर्मचारी व १० अभियंते यांची नेमणूक भरारी पथकामध्ये करण्यात आली आहे
या कालावधीमध्ये सिंगल युज प्लास्टिकला बंदी असून कोणीही प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. नगरपालिकेकडून तब्बल एक हजार मोबाईल टॉयलेट, १ हजार शोष खड्डे शौचालय, महिलांना स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, पालखी मार्गवारील असलेल्या साईड पट्ट्या भरण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहरात अगोदरच एक दिवस फॉगिंग केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आठ पॉईंट उपलब्ध आहेत. तसेच मुधोजी कॉलेज , यशवंतराव चव्हाण हायस्कूल , मलठण येथे मोठ्या प्रमाणात वारकरी मुक्कामी असतात तिथे प्रत्येकी १०० टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे . याचबरोबर खजिना हौद , पचवत्ती चौक येथे मदत केंद्र उभारली जाणार आहेत. तसेच सर्वच शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून गैरप्रकारांना आळा घातला जाणार आहे.
रस्त्यात किंवा शहरात कुठेही वारकऱ्यांच्या वाहनांचा घोटाळा झाल्यास क्रेन व पाच मेकॅनिक नेमले आहेत. त्यांच्याद्वारे वाहनांची मोफत दुरुस्ती केली जाणार आहे. पुणे महापालिका व फलटण नगरपालिका यांच्या दोन अॅम्बुलन्स , दोन अग्निशामक , दोन रेस्क्यू टीम मागवण्यात आल्या आहेत . तसेच बाहेरून आलेल्या अधिकारी , कर्मचारी यांना सांस्कृतिक भवन व त्या पाठीमागे असणाऱ्या नवीन इमारतीमध्ये राहण्याची सोय केली आहे . पिण्याच्या पाण्याचा तब्बल तीस दिवस पुरेल एवढा साठा आहे. फलटण नगरपरिषद व सर्वच प्रशासनाने पालखी सोहळ्या बरोबर आलेल्या वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी सज्ज झाले आहे.