फलटण प्रतिनिधी - फलटण - बारामती रेल्वे मार्गाचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू असून रेल्वे प्रकल्प अधिकारी व संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांच्या समस्यां सोडवत नसल्याने सस्तेवाडी, काबळेश्वर व खुंटे या तीन गावातील शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे यामुळे फलटण बारामती रेल्वे मार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षापूर्वी फलटण - बारामती रेल्वे मार्ग अनेक दिवस रखडला होता संपदानाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी निर्माण झाल्याने सदरचे काम रखडले होते याबाबत अनेक बैठका आयोजित करून संबंधित सर्व अडचणी सोडवण्यात माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर व भूसंपादन संपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी रेल्वे प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वेळोवेळी त्यांच्या समस्या व अडचणी सोडवण्यात येतील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते.यानंतर तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाबरोबर केलेल्या चर्चे अंती तसेच समस्यांचे निराकरण झाल्यानंतर रेल्वे भूसंपादनास स्वेच्छेने परवानगी दिली होती. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्या सहमतीने व चर्चेने भूसंपादन करावे अशी सूचना त्यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
फलटण-बारामती या ३५ कि. मी. लांबीच्या लोहमार्गाचा आराखड्यानुसार फलटण तालुक्यातील सस्तेवाडी, काबळेश्वर व खुंटे या तीन गावामधून रेल्वे मार्गाचे भूसंपादन करण्यासाठी व भुसंपादन बाबत सर्व अडचणी सोडवण्याबाबत शेतकऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य केले होते. तदनंतर सदरच्या रेल्वे कामास मंजूरी मिळून निविदा काढून प्रत्यक्षात रेल्वे मार्गाच्या कामास सुरुवात झाली परंतु रेल्वे मार्गाचे काम चालू असताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पूर्वीचे असणारे पाण्याचे पोटपाठ हे बंद करून शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी पाईप लाईन न टाकता रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.
पिकास पाणी देण्यासाठी रेल्वे प्रकल्प अधिकारी यांनी तसेच संबंधित ठेकेदार यांनी अनेक ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोय न केल्याने शेतकऱ्यांची उभे पिके जाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच यापूर्वी शेतकऱ्यांना संपादित होणाऱ्या जमिनीची मोजणी करून सीमांकनाच्या ठिकाणी पोल उभे करण्यात आले होते ते पोल बदलून त्या ऐवजी इतरत्र नवीन पोल उभे करून शेतकऱ्यांच्या शेतात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रेल्वे विभागाने अतिक्रमण केल्याचे चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे. संबंधित ठेकेदार व रेल्वे प्रकल्प अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासना विरोधात व रेल्वे मार्गाच्या कामाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या पाण्यासंबंधी पूर्वीपासूनचे पोटपाठ न केल्यास तसेच शेतामध्ये अतिक्रमण करून लावलेले नवीन पोल न काढल्यास सस्तेवाडी, काबळेश्वर व खुंटे या तीन गावातील शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार आहे.
सस्तेवाडी, काबळेश्वर व खुंटे या तीन गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या रेल्वे प्रकल्प अधिकारी आणि संबंधित ठेकेदार तसेच भूसंपादन संपादन अधिकारी यांनी तत्काळ सोडवाव्यात अन्यथा रेल्वे प्रकल्पाचे सुरू असलेले काम बंद पाडू शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही -
धनंजय महामुलकर, जिल्हा अध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना
रेल्वे मार्ग आराखड्यात ज्या ठिकाणी संपादन करून रेल्वे मार्ग तयार होत आहे त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे पोटपाठ आहेत त्या ठिकाणी पाईप लाईन टाकून पाण्याची व्यवस्था करण्याची तरतूद निवेदेत असताना ठेकेदाराचा नफा होण्यासाठी रेल्वे प्रकल्प अधिकारी पाईप लाईन टाकत नाहीत रेल्वे मार्ग आराखड्यानुसार कामे होत नसल्याने या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी -
नितीन यादव,फलटण तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना