आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ज्ञानज्योती लोकसंचलित साधन केंद्र, केंद्रीय पत्रकार संघ, निकोप हॉस्पिटल आणि डायमंड ग्रुप ऑफ सोशल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुणवरे (ता. फलटण) येथे महिला बचत गटातील महिलांचा मेळावा आणि ग्रामीण महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गुणवरे (ता. फलटण) : आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ज्ञानज्योती लोकसंचलित साधन केंद्र, केंद्रीय पत्रकार संघ, निकोप हॉस्पिटल आणि डायमंड ग्रुप ऑफ सोशल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुणवरे (ता. फलटण) येथे महिला बचत गटातील महिलांचा मेळावा आणि ग्रामीण महिलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महिलांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानज्योती लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्ष सौ. ज्योत्स्ना घोलप होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोग तज्ञ डॉ. जे.टी. पोळ, ज्येष्ठ पत्रकार आणि गावचे उपसरपंच प्रा. रमेश आढाव, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक राहुल खापर्डे, अर्जुन डोंगरे, डॉ. त्रिबंक गावडे, जुनेद शेख, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुनिता घुले, ग्रामसेवक शिवाजीराव भोसले आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पोळ म्हणाले, ग्रामीण महिला घरात, शेतात सतत राबत असतात त्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून निकोप हॉस्पीटलने ग्रामीण महिलांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याचे ठरविले आहे. यापुढे आमच्या हॉस्पीटलच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित केली जाणार आहेत.
देश विकासात महिलांचे महत्वपूर्ण योगदान आहे. आपल्या मुलांना घडविण्याचे काम माहिलाच करतात. महिलांचे आर्थिक नियोजन उतम असते. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रिडा, साहित्य, सांस्कृतिक, क्षेत्रांत महिला आज मागे नाहीत. शहरी भागातील महिलांप्रमाणेच ग्रामीण महिलांचेही नाव विविध क्षेत्रात मोठे होताना दिसत असल्याचे डॉ. पोळ यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
बँक ऑफ महाराष्ट्रचे राहुल खापर्डे यांनी महिलांना बचत गटांसाठी असणाऱ्या कर्ज योजनांची माहिती दिली. तसेच एलआयसी ऑफ इंडिया फलटण शाखेचे सहाय्यक मॅनेजर अर्जुन डोंगरे यांनी उपस्थित महिलांना आयुर्विम्याचे महत्त्व आणि फायदे सांगितले. याप्रसंगी प्रा. रमेश आढाव, डॉ. गावडे यांनी विविध क्षेत्रातील माहिलांच्या कार्यकर्तृत्वाविषयी विचार मांडून उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकोपचे जनसंपर्क अधिकारी संदिपकुमार जाधव यांनी केले, स्वागत बचत गटाच्या सहयोगिनी शैलाताई चव्हाण व वैशाली मोरे यांनी केले. सुत्रसंचालन रेश्मा मोरे यांनी केले. आभार उषा चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास फलटण पूर्व भागातील विविध गावातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



















