झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. राज्य सरकारच्या या निर्णयाचा जैन समाजाने विरोध केला आहे.
झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. राज्य सरकारच्या या निर्णयाचा जैन समाजाने विरोध केला आहे. फलटण येथे जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढत फलटण बंदचे आवाहन केले.
संपूर्ण जैन समाजाने आज भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला फलटण तालुक्यातील जैन समाज बांधवांनी पाठींबा दिला असून आज सर्व जैन बांधवांनी आपले दुकान, व्यवसाय बंद ठेऊन या निर्णयाचा निषेध नोंदवला आहे.
झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण स्थित आहे. या तीर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्यास जैन समाजाचा अनेक दिवसांपासून विरोध आहे. पर्यटन स्थळे आणि वन्यजीव अभयारण्य यासारख्या गोष्टी करण्यासाठी सरकारने जारी केलेली अधिसूचना धार्मिक श्रद्धा दुखावणारी आहे. कोणताही सुसंस्कृत समाज अशा योजना स्वीकारणार नाही. सरकारने सम्मेत शिखरजीसह देशातील सर्व धार्मिक स्थळे पवित्र स्थळे म्हणून घोषित करून तेथे दारू, मांसाहार व इतर व्यसनांवर बंदी घालावी. पवित्र स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे चुकीचे असून सम्मेत शिखरजीला पर्यटन स्थळ करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जैन समाजाने दिला.
या निषेध मोर्चा नंतर फलटण येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना जैन समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जैन समाजाच्या निषेध मोर्चाला भाजपा फलटण, राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक सेल फलटण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ ), मराठा क्रांती मोर्चा व फलटण शहर व्यापारी संघटनाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी मा. नगरसेवक अनुप शहा, यांच्या सह जैन समाजातील मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.