फलटण प्रतिनिधी : समाजातील विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे असून, विविध क्षेत्रांमध्ये अधिकारी पदावर काम करणाऱ्या प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या संधीचा वापर समाजासाठी करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांनी व्यक्त केले. ते फलटण येथे झालेल्या लुंबिनी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर जयवंत काकडे, सेवानिवृत्त प्राचार्य विकास काकडे, मुधोजी हायस्कुलचे प्राचार्य सुधीर अहिवळे, माजी नगरसेवक दत्ता अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सहाय्यक विक्रीकर आयुक्त ह्रिषीकेश अहिवळे, ॲड. मेघा अहिवळे, विक्रीकर निरीक्षक अनिकेत काकडे, सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रसाद काकडे, सौ. सुनंदा काकडे सौ. प्रियदर्शनी सावंत, असिस्टंट मॅनेजर पंजाब नॅशनल बँक, विशाल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. आढाव म्हणाले, पालक - विध्यार्थी संवाद होणे गरजेचे आहे ज्यामाध्यमातून भविष्यातील सबळ व शिक्षितपिढी घडावी. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरनेने अनेक विध्यार्थी घडले. वैयक्तिक आयुष्यात अधिकार पदावर विराजमान झाले असले तरीही बाबासाहेबांना अभिप्रेत आपण काम करतोय का? याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचा टोला यावेळी प्रा. आढाव यांनी लगावला.
सहाय्यक विक्रीकर आयुक्त ह्रिषीकेश अहिवळे म्हणाले की, विध्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आपल्या अभ्यासासाठी विधायक करावा. अभ्यास सातत्याने व निरंतर करताना अभ्यासाचे वेळापत्रक करा असा सल्ला यावेळी दिला. वाचणाची सवय महत्वाची असल्याचे यावेळी अहिवळे यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर नालंदा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने 10 वी आणि 12वी तील विशेष प्राविण्य मिळवलेले तीन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली कांबळे यांनी केले प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य विकास काकडे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष कुणाल काकडे यांनी मानले.