विध्यार्थीदशे पासूनच अभ्यासामध्ये गती प्राप्त करताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना उद्योगांचे परीक्षण करत उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे असा सल्ला विडणी (ता. फलटण ) चे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी विध्यार्थ्यांना दिला.
विध्यार्थीदशे पासूनच अभ्यासामध्ये गती प्राप्त करताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी विविध उद्योगांचे परीक्षण करत उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले पाहिजे असा सल्ला विडणी (ता. फलटण ) चे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी विध्यार्थ्यांना दिला. ते नामदेवराव सूर्यवंशी ( बेडके ) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटचा विशेष श्रमसंस्कार शिबीर समारोप प्रसंगी विडणी येथे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पवार होते. यावेळी पत्रकार स. रा. मोहिते, धैर्य टाईम्सचे संपादक व प्रिंट व डिजिटल मीडिया असोसिएशनचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, प्राचार्य डॉ. दिपक राऊत, प्रा. सतेज दणाणे, ग्रामविकास अधिकारी अप्पासाहेब साळुंखे, धनाजी नेरकर सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सरपंच सागर अभंग म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष देताना केवळ नोकरी मिळवण्याकरिता शिक्षण न घेता विविध व्यवसायाचा व्यासंग, आधुनिक शेती, समाजकारण, राजकारण, याकडे करिअरची संधी म्हणून पाहणे काळाची गरज आहे. माझे बंधू कक्ष अधिकारी धीरज अभंग यांनी अपार कष्ट व मेहनतीच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. अशीच मेहनत आपणही करून भविष्यामध्ये आपणही यशस्वी व्हावे अशा सदिच्छा सागर अभंग यांनी या वेळी व्यक्त केल्या.
प्रिंट व डिजिटल मीडिया असोसिएशन सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की, सात दिवसाच्या विडणी येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सप्ताहाला निरोप देत असताना विडणी येथील व सध्या मुंबई येथे मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणारे धीरज अभंग साहेबांचा आदर्श घेऊन आपणही आपल्या गावातील आदर्श अधिकारी व्हायचे ध्येय बाळगावे. तर विडणी सारख्या सुसंस्कृत गावातील अनेक उद्योजकांचे गुण आपल्या अंगी यावेत म्हणून दिवस रात्र मेहनत करावी. पत्रकार स. रा. मोहिते यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. पोलीस पाटील धनाजी नेरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले की, एन एस एस कॅम्प हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण असतो. अशा कॅम्पद्वारे विद्यार्थ्या मध्ये सामाजिक जाणीव रुजवली जाते व ग्राम विकास साधला जातो. यावेळी त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील एन एस एस कॅम्प चे अनुभव कथन केले.
विडणी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब साळुंखे यांनी आपल्या भाषणामध्ये विडणी गाव व एन एस एस कॅम्प यांच्या समन्वयाबद्दल गौरव उद्गार व्यक्त केले तसेच विडणी गावचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संस्थापक कै. नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) नानांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना चे प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी सादर केले. त्यामध्ये त्यांनी शिबिरार्थी यांच्या कार्याचे कौतुक केले व विडणी गावचे सरपंच व ग्रामस्थ यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक राऊत यांनी एन. एस. एस. कॅम्पचा आढावा सादर केला.
उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विडणी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवर, प्राध्यापक वृंद व सर्व शिबिरार्थींचा ही श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला शिबिरार्थीं शिवम घनवट, मयूर साळवे, कु. रिया मुलानी, कु. संजना चव्हाण, कु. धनश्री धोत्रे, रमेश बोडरे, समीर दडस, सूरज पोकळे, उमेश नाळे, कु. प्रेरणा रणवरे, कु. विशाखा मोरे, कु. साक्षी तिवाटणे इत्यादींनी एन एस एस कॅम्प चे अनुभव व गाव आणि ग्रामस्थां प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी तिवाटणे, प्रास्ताविक प्रा. डॉ. सतेज दणाणे, कॅम्प आढावा प्र. प्राचार्य डॉ. दीपक राऊत, स्वागत सत्कार प्रा. डॉ. संदेश बिचुकले, कार्यक्रमाचे आभार प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी मानले.
रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटचा 'विशेष श्रमसंस्कार शिबिर' (निवासी कॅम्प 13/02/23 ते 19/02/23) मौजे विडणी येथे संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना च्या घोषणा देऊन व राष्ट्रीय सेवा योजना गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.