फलटण प्रतिनिधी : झाडे लावा, जगवा जगा” हा जगद्गुरू संत तुकारामांनी आपल्या अभंगात प्रतिध्वनित केलेला संदेश आहे. वृक्ष मानवतेला अनमोल भेटवस्तू देतात, निसर्गाने दिलेली जीवनरेखा म्हणून काम करतात. त्यामुळे झाडांचे संरक्षण आणि संगोपन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच संत तुकारामांच्या संदेशाची अनोख्या पद्धतीने आठवण आपल्याला फलटणचा अवलिया राहुल अहिवळे करुन देत आहेत.
"कावळा करी काव - काव मानवा एक तरी झाडं लाव" अशा आशायाचा फलक आपल्या हातात घेऊन शहरातील विविध ठिकाणी जनजागृती करण्याचे काम राहुल अहिवळे करताना दिसतात. झाडे लावण्याचा संदेश देणारे सोशियल मीडियातील त्यांचे रिल्स लोकांना मनोरंजनातून मोठा संदेश देत आहेत.
बसस्थानक, विविध शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे, विविध कार्यालय अशा ठिकाणी अहिवळे आपल्या हातातील फलक घेऊन उभे राहतात व नागरिकांचे लक्ष वेधतात. त्यामुळे ते आता चांगलेच परिचित झाले आहेत.
आज मानवाच्या हव्यासापायी निसर्गाचे पावलोपावली शोषण घडत आहे. शहरीकरणाच्या, प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. लागवाडीखालची जमीन, वनराया नष्ट करून तेथे इमारती, गृहप्रकल्प उभारले जात आहेत. परिणामी, नैसर्गिक संपत्तीचा, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास होत चालला आहे. त्यातून अवकाळी पाऊस, जागतिक तापमानवाढ, हिमनग वितळणे, त्सुनामी, भूकंप, भूस्खलन अशा नैसर्गिक समस्या वाढत चालल्या आहेत.
आज दरमाणशी किमान एक तरी झाड लावले गेले पाहिजे व लावलेल्या झाडाचे आजन्म संगोपन केले पाहिजे परिवारातील एका सदस्याप्रमाणे स्वतः लावलेल्या झाडाची जबाबदारी आपण काळजीपूर्वक घेतली पाहिजे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आरक्षित वनक्षेत्रे, वनराया यांच्या संवर्धनासाठीचे सुधारित कायदे, नियम अंमलात आणले गेले पाहिजेत हे मात्र खरे.