60 च्या दशकात ’गंगा जमुना’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या अरुणा यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 3 मे 1952 रोजी झाला. त्यांना दोन भाऊ आहेत. इंद्र कुमार आणि आदी इराणी ही त्यांची नावे आहेत. 1961 मध्ये ’गंगा जमुना’ या चित्रपटात काम करत असताना अरुणा केवळ नऊ वर्षांच्या होत्या. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी आतापर्यंत 300 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
’थोडा रेशम लगता है’, ’चढती जवानी मेरी चाल मस्तानी’, ’दिलबर दिल से प्यारे’, ’मैं शायर तो नहीं’ ही बॉलिवूड चित्रपटांमधील सुपरहिट गाणी आहेत, जी अरुणा इराणी यांच्या डान्समुळे आणखीनच लोकप्रिय झाली. ’जहां आरा’ (1954), ’फर्ज’ (1967), ’उपकार’ (1967), ’आया सावन झूम के’ (1969), ’कारवां’ (1971) यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये अरुणा यांनी काम केले. कारवां या चित्रपटातील अरुणा यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. या चित्रपटातील ’चढती जवानी मेरी चाल मस्तानी’, आणि ’दिलबर दिल से प्यारे’ ही गाणी अरुणा यांच्या डान्समुळे लोकप्रिय झाली.
1972मध्ये अरुणा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह ’बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात स्क्रिन स्पेस शेअर केली होती. या चित्रपटात महमूदसुद्धा होते. अरुणा यांचे नाव त्याकाळी महमूद यांच्यासोबत जुळले होते. त्यांनी महमूद यांच्यासह ’औलाद’ (1968), ’हमजोली’ (1970), ’नया जमाना’ (1971), ’गरम मसाला’ (1972) आणि ’दो फूल’ (1973) या चित्रपटांमध्ये काम केले. महमूद यांच्यात गुंतत जात असल्याचे अरुणा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महमूद यांच्यावरुन आपले लक्ष चित्रपटांवर केंद्रित केले.
अरुणा यांनी इंडस्ट्रीत येणा-या नवोदित अभिनेता-अभिनेत्रींना खूप मदत केली. त्यांनी ’फर्ज’मध्ये जितेंद्र, ’बॉबी’मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया, ’सरगम’मध्ये जयाप्रदा, ’लवस्टोरी’मध्ये कुमार गौरव आणि ’रॉकी’मध्ये संजय दत्तची बरीच मदत केली. मात्र हे सर्व सुपरस्टार बनले आणि दुर्दैवाने अरुणा इराणी या सहाय्यक अभिनेत्रीच राहिल्या. ’पेट प्यार और पाप’ (1985) आणि ’बेटा’ (1993) या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी अरुणा यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2012 मध्ये त्यांना फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये अरुणा यांनी अनेक मराठी चित्रपटांतही अभिनय केला. शिवाय छोट्या पडद्यावरही त्यांचे दर्शन घडले. 2000मध्ये ’जमाना बदल गया’ या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ’कहानी घर घर की’(2006-2007), ’झांसी की रानी’ (2009-2011), ’देखा एक ख्वाब’ (2011-2012), ’परिचय’ (2013-2013), ’संस्कार धरोहर अपनों की’ (2013-14) या टीव्ही शोजमध्ये अरुणा यांनी महत्त्वाच्या भूमिका वठवल्या आहेत.