फलटण धैर्य टाईम्स :
आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूर येथे पोहोचतात. विठुरायाच्या दर्शन ओढीने अनेक नैसर्गिक अडथळ्यांना पार करून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतात. त्याच पद्धतीने आपला व्यवसाय, नोकरी यामधून वेळ काढून सायकलवारी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त फलटण रायडर्स यांनी सायकल वारीचे प्रथमच आयोजन केले आहे. दि. २१ जून रोजी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेवून पंढरपूरसाठी फलटण रायडर्स प्रस्थान ठेवणार आहेत.
फलटण रायडर्सच्या वारीचे हे पहिलेच वर्ष आहे. यामध्ये फलटण व परिसरातील १२ वर्षे वयापासून ७२ वर्षे वयापर्यंतच्या सायकलपटूंचा सहभाग आहे. दि. २१ रोजी पहाटे ५ वाजता फलटणमधून प्रस्थान केल्यानंतर प्रथम शिंगणापूर फाटा येथे पहिला थांबा असेल. दुसरा थांबा खुडूस येथे असणार आहे.
सायकल वारीतील सर्व सहभागी सदस्य भोजन व विश्रांतीसाठी चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी थांबणार आहेत. त्यानंतर ही वारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहे
दि. २१ जून रोजी पंढरपूरमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून ७५ ग्रुपचे ३ हजारहून अधिक सायकलस्वार दाखल होणार आहेत.
दि. २२ जून रोजी सकाळी ५.४५ वाजता सर्व सायकलस्वारांची नगर प्रदक्षिणा होणार असून त्यानंतर रेल्वे ग्राउंड, पंढरपूर येथे सायकल रिंगण व सायकल संमेलन होईल. सायकल संमेलनात अमित समर्थ यांचे सर्वांना मार्गदर्शन होणार आहे. या निमित्ताने फलटण रायडर्सच्या माध्यमातून फलटणमधून प्रथमच सहभागी होणाऱ्या ८० सायकल स्वारांना या आनंदवारीचा अनुभव घेता येणार आहे.