सातारा जिल्ह्यासह राज्यातील महाविद्यालयामध्ये फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उत्कर्षसाठी मी कायम वचनबद्ध असल्याचे मत महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष व पीसीआय नवी दिल्लीचे सदस्य विजय पाटील यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकर ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर लिंब येथील फार्मसिस्ट संपर्क अभियान अंतर्गत सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते.
लिंब (सातारा) : सातारा जिल्ह्यासह राज्यातील महाविद्यालयामध्ये फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उत्कर्षसाठी मी कायम वचनबद्ध असल्याचे मत महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष व पीसीआय नवी दिल्लीचे सदस्य विजय पाटील यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकर ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर लिंब येथील फार्मसिस्ट संपर्क अभियान अंतर्गत सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते.
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. राहुल जाधव, सातारा जिल्हा फार्मसी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, सावकार कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. वसंत लोखंडे, मसूर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रम शिंदे, डॉ. अमित खाडे, कोरेगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय माने, संघटक सचिव सागर भोईटे, स्वप्नील बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.
विजय पाटील म्हणाले, औषध निर्माण शास्त्र शाखेत ज्ञान घेणार्या विद्यार्थ्यांनी उद्योजगता विकासाचे प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात फार्मासिस्ट अधिक सक्षम करण्यासाठी राज्य फार्मसी कौन्सिल नजीकच्या काळात धोरणात्मक निर्णय घेणार आहे. याचा लाभ राज्यातील सर्व फार्मासिस्टला होणार आहे. त्यांचे हित लक्षात घेऊन संपूर्ण राज्यातील फार्मसिस्टना पूर्णतः घडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
जनसंपर्क अधिकारी श्री. काटेकर म्हणाले, विजय पाटील यांनी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळत फार्मसी क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असणारे महत्वाचे बदल करून फार्मासिस्ट व केमिस्ट असोसिएशन मध्ये सुसंवाद व समन्वय साधून अनेक कठीण प्रश्न सोडवले आहेत. राज्यातील फार्मसी घटक अधिक सक्षम व समृद्ध करण्यासाठी त्यांचे प्रयत्न हे कौतुकास्पद आहेत.
प्राचार्य डॉ. वसंत लोखंडे म्हणाले, औषध निर्माण क्षेत्रातील बदलती समीकरणे व आव्हाने सक्षमपणे पेलण्यासाठी विजय पाटील यांचे नेतृत्व सक्षम आहे. ते स्वतः फार्मासिस्ट असल्याने या क्षेत्रातील असणाऱ्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. गौरीशंकर फार्मसी लिंबचे उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले, मानवी जीवनाच्या आरोग्याशी संबंधित असणारे हे क्षेत्र आता अधिक प्रगल्भ होत आहे. व्यवसाय व नोकरीसाठी याक्षेत्रात चांगली संधी आहे. फक्त विद्यार्थ्यांना त्याची योग्य ती माहिती मिळणे आवश्यक आहे.
केमिस्ट व फार्मासिस्ट यांचे व्यासपीठ उभारणार :
राज्य केमिस्ट असोसिएशन व फार्मासिस्ट यांचे एक व्यासपीठ उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. राज्य फार्मसी कौन्सिल यासाठी पुढाकार घेणार आहे. त्यांना अधिक सक्षम व परिपूर्ण घडविण्यासाठी उद्योजक विकास प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात घडणारे बदल तसेच औषध कंपन्यांचे धोरणात्मक निर्णय याबाबतची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र माहिती केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
प्रारंभी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांचा महाविद्यालयातर्फे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. महेश थोरात, डॉ. भूषण पवार, प्रा. माधुरी माहिती, प्रा. धैर्यशील घाडगे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय देशमाने यांनी केले.