फलटण | धैर्य टाईम्स |
आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील (पालखी महामार्ग) वाढत्या लोकवस्तीचे आणि कृषी, औद्योगिक दृष्टीने विकसित होत असलेल्या महत्त्वाच्या शहरात एक नवीन अद्ययावत व सर्व सुविधांनी सुसज्ज बसस्थानक होणे काळाची गरज असल्याने येथील बसस्थानकाचा विस्तार व सुशोभीकरण करण्याचा निर्णय शासनस्तरावर झाल्याचे आ. सचिन पाटील यांनी सांगितले आहे.
माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आपण स्वतः याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) विविध जागांवर सार्वजनिक खाजगी सहभाग या तत्त्वावर विस्तार प्रकल्प राबविण्याकरिता राज्यातील विविध बसस्थानकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये फलटण बसस्थानकाचा समावेश करण्यात आल्याचे आ. सचिन पाटील यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या योजनेनुसार फलटण शहर व तालुक्यासाठी स्वच्छ, सुंदर, प्रशस्त एस. टी. बसस्थानक, बस आगार उभारण्याबरोबर प्रशस्त व्यापारी संकुल उभे राहिल्याने प्रवाशांना उत्तम प्रवासी वाहतुकीची सुविधा देताना बसस्थानकावर उतरल्यानंतर आवश्यक सर्व वस्तू त्यामध्ये शेतीसाठी आवश्यक खते, कीटकनाशक, बी बियाणे, शेतीची औजारे, त्याचे सुटे भाग किंवा घरगुती वस्तू, किराणा, कपडे, अन्नधान्य, अगदी मिठाई किंवा औषधे येथे एकाच छताखाली खरेदी करता येतील, तेथेच एक उत्तम रेस्टॉरंट असेल आणि मुख्यतः तरुणांना या प्रशस्त व्यापारी संकुलात स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे आ. सचिन पाटील यांनी निदर्शनास आणून देत लवकरच ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.