फलटण | धैर्य टाईम्स | 21 जून
कोळकी या फलटण शहरालगतच्या गावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास बाब म्हणून अंदाजे ९० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेस तातडीचे मंजुरी आदेश दिले असल्याची माहिती माजी खा. रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी दिली.
कोळकी गावासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर होवून ग्रामस्थांना दररोज स्वच्छ, निर्जंतुक, पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याचे समजताच कोळकी ग्रामस्थांनी फटाके वाजवून व जिलेबी वाटप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिनपा पाटील यांचा जयजयकार करत जल्लोष केला.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खा. रणजितसिह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांचे ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले. कोळकी है फलटण शहरालगतचे गाव असून या गावाची लोकसंख्या व विस्तार झपाट्याने वाढत आहे. कोळकी गावासाठी सर्व नागरी सोयी सुविधा पुरविणे व देखभाल दुरुस्ती कामे ग्रामपंचायतमार्फत केली जातात. सद्यस्थितीत कोळकी ग्रामपंचायतीने २०१५ मध्ये सुधारित नळपाणी पुरवठा योजना तयार करून ग्रामस्थांना पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे.
सदर योजना नीरा उजवा कालवा जल उद्भव गृहीत धरून राबविली आहे, या योजनेत गावासाठी २ महिने पुरेल इतक्या क्षमतेचा साठवण तलाव आहे. ही योजना १५ हजार लोकसंख्या अपेक्षित घरुन २०१५ साली अस्तित्वात आली परंतु सध्याची लोकसंख्या ३० हजार असल्याने आठवड्यातून केवळ २ वेळा पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
गावातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी ही बाब माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आ. सचिन पाटील, अभिजित नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, बाळासाहेब काशिद, सचिन रणवरे, संजय देशमुख, उदयसिंह निंबाळकर, संदीप नेवसे, सतीश शेडगे, विकास नाळे, रणजित जाधव, गोरख जाधव, यशवंत जाधव, सचिन हजारे, किरण जाधव, राजू खिलारे, निरंजन निंबाळकर,विष्णू फडतरे, सागर चव्हाण, रोहन शिंदे, गणेश शिंदे, माउली शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होवून २०५४ साली कोळकी गावची लोकसंख्या अंदाजे ७३,००० ग्राह्य धरून गावासाठी नवीन योजना तयार करण्यात आली. यामध्ये जादा साठवण क्षमता असलेला तलाव बांधणे गरजेचे आहे. अस्तित्वात असलेल्या सर्व उपायांचा वापर करून नवीन जलशुद्धीकरण केंद्र, दाबनलिका, उंच टाकी, वितरण व्यवस्था, सोलर पॅनेल, प्रत्येकाचे घरी नळ, निर्जंतुक, स्वच्छ पाणी देणे गरजेचे असल्याचे ठरवून आराखडा तयार करण्यात आला. सदर प्राथमिक आराखडा व अंदाजपत्रक सादर करून माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिल्यानंतर त्यांनी वरीलप्रमाणे कोळकीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. कोळकी गावातील राजे गटाचे पदाधिकारी यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी माजी खा. रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी कोळकी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला होता, तो शब्द त्यांनी व आ. सचिन पाटील यांनी पाळला याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.