फलटण प्रतिनिधी :- महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ऐन दिवाळीत होळ येथील सव्वा एकर ऊस जळून खाक झाला असून सदर शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जळालेल्या ऊसाची भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मौजे होळ येथील ऊस शेतकरी विजय भगवान पुरी राहणार होळ यांचे होळ गटनंबर ५१३ व ८१५ ब एकूण आडसाली ऊसाचे क्षेत्र असून शनिवार दिनांक २ रोजी दुपारी दोन वाजता वीज खांबावरील जंप जळून मोठा स्फोट झाला व आगीचा लोळ खाली उभ्या असणाऱ्या तुटण्यास आलेल्या उसात पडून आग लागली यावेळी शेजारील शेतात काही शेतकरी काम करत होते त्याच्या समक्ष ही घटना घडली.
या आगीत ४ एकर पैकी सव्वा एकर ऊस आगीत भस्मसात झाला व नविन जैन ठिबक सिंचन संपूर्ण जळून खाक एकूण आर्थिक नुकसान तीन लाख रुपये झाले आहे. सदर नुकसानीस महावितरण जबाबदार असल्याने तीन लाख नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी विजय भगवान पुरी यांनी केली आहे.
मागील काही दिवसांपासून फलटण तालुक्यात वीज वाहिनींच्या दोषामुळे शेतात आग लागण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सर्वे करून लोंबणाऱ्या तारा व वाकलेले पोल यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्याच्या लाखोंच्या पिकांचे नुकसान होत आहे.