रामराजेंनी कटकारस्थाने करून अनेक तक्रारींचा ससेमिरा माझ्या मागे लावला. त्यांच्या तक्रारींना आम्ही कधीच भीक घातली नाही. आम्ही जनतेची कामे करतोय व पुढे येतोय म्हणून विरोध चालू आहे. फलटण शहरातील अनेक गुंड, तडीपार यांना नगरसेवक केले व शहर वासियांना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत त्यामुळे शहराचे पूर्णतः वाटोळे करण्याचे काम रामराजेनी केल्याचा आरोप खासदार रणजितसिंह यांनी केला.
फलटण तालुक्यातील जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गणनिहाय भागांचा दोन दिवसांचा दौरा समाप्तीनंतर शहरातील गजानन चौक येथील आयोजित जाहीर सभेत खासदार नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी माणचे आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. जिजामाला नाईक-निंबाळकर, सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, उद्योजक हणमंत (आप्पा) मोहिते, पै. बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अशोक जाधव, अनुप शहा, नानासो इवरे, आर पी आय जिल्हा सचिव विजय येवले, डॉ. प्रवीण आगवणे, सचिन अहिवळे, डॉ. धनंजय आटोळे, सुशांत निंबाळकर, डॉ. सुभाष गुळवे, महिला आघाडीच्या उषा राऊत, सौ. सावंत उपस्थित होते.
१५ वर्षे चालतील एवढी कामे मंजूर :
खासदार रणजितसिंह म्हणाले, फलटण तालुका दौऱ्यात दोन दिवसात २० हजारांहून अधिक ग्रामस्थांना आपण प्रत्यक्ष भेटलो, त्यांच्या समस्या जाणुन घेवुन ९०% समस्यांचा जागेवरच निपटारा केला. विरोधक म्हणतात खासदार म्हणून काय काम केले? तर त्यांना मी सांगू इच्छितो लोकसभेचा खासदार म्हणुन निवडून आल्यावर नाईकबोंबवाडीतील एमआयडीसी फाईलची पूर्तता केली, निरा देवधर मधुन बारामतीला जाणारे पाणी थांबविले, २३ वर्षांपासून रखडलेला फलटणचा बंद रेल्वे प्रकल्प कार्यान्वित केला, रेल्वे कामासाठी १२०० कोटींचा निधी उपलब्ध केला, फलटण-आदर्की-शेणोली मार्ग, पुणे-बेंगलोर महामार्ग, बारामती-सांगली महामार्गाची मंजुरी मिळवत जवळपास १ लाख कोटींचा निधी उपलब्ध केला, फलटण तालुक्यात ४०० ते ५०० कोटींची कामे मंजूरआहेत, माणमध्ये ६५० कोटींचा निधी मंजूर करून उपलब्ध केला, पुढची १५ वर्षे चालू राहतील एवढी कामे मंजुर केली असून आता फक्त उर्वरित निरा-देवधरचे काम पूर्ण करणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी यावेळी सांगितले.
सत्ताधाऱ्यांनी ३० वर्षांत काय केले :
तब्बल ३० वर्षे सत्तेच्या काळात सत्ताधाऱ्यांनी दहशतवादी, गुंड, क्रिमीनल, तडीपार लोकांना नगरसेवक केले. शहरातील पायाभुत सुविधांच्या तीनतेरा वाजविल्या. नागरिकांना पायाभूत सुविधासुद्धा देवु शकले नाहीत. शहराचं पुर्णतः वाटोळं केलं. तासगांवकरांना फलटणमधुन हाकलून त्यांचा कारखाना होवु दिला नाही. दहशदवाद निर्माण करून प्रशासनास हाती धरून सर्वसामान्यांनाही त्रास दिला. असा आरोप करत माझ्या एवढा निधी फलटणला कोणीही आणू शकणार नसून पुढच्या अनेक पिढ्यांना केंद्र सरकारच्या निधीतून झालेला विकास पहायला मिळेल. असे खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले.
माझ्या विरोधात तब्बल ३० तक्रारी :
ज्याला मी चप्पल आणि कपडे घालायला शिकवली त्या माणसाला हाताशी धरून माझ्यावर तब्बल ३० तक्रारी दाखल करायला लावल्या. नरसोबा पतसंस्था व गोविंदच्या माध्यमातून त्याला पैसे दिले, भांडवल दिले, मात्र त्या ३० तक्रारींचा माझ्यावर एकही गुन्हा दाखल झाला नाही. पडद्याआड चालणारी कटकारस्थाने आज सर्वांना माहित होत असल्याचा पर्दापाश खासदार रणजितसिंह यांनी दिगंबरआगवणे यांचे नाव न घेता केला. तालुक्यातील जनतेने मला मताधिक्य दिले, आशिर्वाद दिला, ताकद दिली याचा योग्य वापर फलटणमधील तरुण पिढीच भविष्य घडविण्यासाठी करणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
छ. शिवाजी महाराजांचे आदर्श घेतलेले देशाचे नेतृत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तंतोतंत आदर्श घेतलेले देशाच नेतृत्व आहे. कलम ३७० रद्द करून काश्मीरला भारताशी जोडले. राम मंदिर निर्माण केले. पुलवामा हल्ला झाला त्याला प्रतिउत्तर पाकिस्तानात घुसुन दिले. अशा निधड्या छातीचे, पोलादी पुरुष, कणखर मनाचे, देशाप्रती प्रेम असणारे मोदींसारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही. कोरोना संकट काळात केंद्राने लस दिली बारामतीच्या पवारांनी दिली नाही. राज्य सरकार आता शेतकऱ्यांना ६००० रुपयांची मदतही करणार आहे. औषध विमा, गरिबांना घरे, ८० कोटी लोकांना मोफत धान्य अशा अनेक संकल्पना राबवत असलेला महानायक नेता देशाला लाभला असल्याचे खासदार नाईक-निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
रणजितसिंह यांचे पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन
खासदार रणजितसिंह यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेली कामे व पत्रव्यवहार, उपलब्ध केलेला कोट्यवधींचा निधी याचे सादरीकरण आयोजित सभेत मोठ्या स्क्रीनवर केले. यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल केंद्राची योजना फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ७२ गावात मीच मंजुर केली असून राष्ट्रवादीचा काहीही संबंध नसताना राष्ट्रवादीचे नेते सदर कामांची बोगस उद्घाटने करून श्रेय घेत आहेत. जल जीवन योजना विविध गावात पोहचविण्याचा प्रयत्न माझा असून मी केलेला पाठपुरावा जेव्हा जनतेसमोर मांडला तेव्हा राष्ट्रवादीची मंडळी दोन दिवसात गायब होऊन सुरु असलेली नारळ फोडाफोडी बंद झाली असल्याचे खासदार नाईक-निंबाळकर यांनी निदर्शनास आणुन दिले.
भाजपात घ्यावे म्हणून रामराजेंची धडपड
राज्यात शिंदे गट आणि भाजप सरकार आले त्या दिवसापासून पाण्यातील माशासारखी यांची अवस्था झाली. जयकुमार गोरे व देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तडजोडीसाठी आमची बैठक लावा असे निरोप येवु लागले. परंतु भाजपा प्रवेश तर सोडाच आता तुम्हाला राष्ट्रवादीसुद्धा उमेदवारी देईल का नाही अशी शंका आहे. डेव्हलपर्सच्या माध्यमातून जेवढा पैसा टाकायचा आहे तेवढा टाका, माझ्याबरोबर लढा. किसमें कितना है दम हे एखदा बघूच असा इशाराही खासदार यांनी रामराजे यांना दिला.