फलटण प्रतिनिधी :
श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी जव्हारच्या कुबड्या घेणाऱ्या श्रीमंत रामराजे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांचे पाय काढण्याची भाषा करतात तर बोलल्याप्रमाणे तुम्ही करून दाखवाच असे आवाहन देतानाच फलटणची जनता तुमच्या कमरेला लंगोटी सुद्धा ठेवणार नाही व मला बोलला तर मी गप्प बसणार नाही त्यामुळे तुमच्या डोकयातील मस्ती जिरवायची वेळ आणू देऊ नका असा घणाघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला ते हॉटेल जॅक्सन इन ( सुरवडी) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, श्रीराम सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा असून दरवाढ मागणी हा त्यांचा हक्क आहे, असे असताना सेवानिवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या ऊस दरवाढीच्या मागणीवरून रामराजे यांनी वरील वक्तव्य केले होते त्या वक्तव्याचा खासदार रणजीतसिंह यांनी पलटवार करत रामराजे यांचा समाचार घेतला.
गेली पंधरा वर्षे श्रीराम कारखान्याचा हिशोब नाही, कर्ज किती आहे हे माहिती नाही, जमीन विकूनही कर्ज किती असे सवाल उपस्थित करतानाच वार्षिक भाडे 12 ते 13 कोटी मिळणे अपेक्षित असताना आज दिड कोटी व्याज देऊन कारखान्याला फक्त पन्नास लाख रुपये मिळतात याचे आश्चर्य व्यक्त करतानाच आपला भोंगळ कारभार व पैशाचा भ्रष्टाचार न कळण्याएवढे आम्ही दूध खुळे आहोत का असा सवाल यावेळी खासदार रणजितसिंह यांनी उपस्थित करीत वार्षिक सभा दादागिरी करत घेता जर तुमचा कारभार पारदर्शक असेल तर तुम्ही दादागिरी का करता असे यावेळी खासदार रणजितसिंह म्हणाले.
फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ, फलटण तालुका खरेदी विक्री संघ हे बंद पाडले तर साखरवाडी कारखान्याचे वाटोळे करत मालोजीराजे सहकारी बँक बुलढाणा बँकेत चालवण्यासाठी दिली केवळ यावरच रामराजे थांबले नसून स्वराज साखर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत माझ्यावर राजकीय षडयंत्र करणाऱ्या रामराजेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटतेय असे खासदार रणजितसिंह यांनी सांगतानाच श्रीराम पेक्षा स्वराज ऊसाला जादा दर देत असून स्वराज वर बोलण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचे टीकास्त्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोडले.
नीरा - देवघरच्या कामाचे टेंडर निघाले असून फलटण - बारामती रेल्वेचे काम सुरू झाले आहे तर धोम - बलकवडी हा प्रकल्प बारा महिने लवकरच कार्यान्वित होत असून फलटण - पुणे रेल्वे सेवा सुरूच असून पुणे पंढरपूर महामार्गाचे काम पूर्णत्वास आले असून शेकडो कोटींचे कामे आपण फलटण तालुक्यासाठी केले असल्याचे शेवटी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.