फलटण प्रतिनीधी:- सुरवडी ता फलटण येथे नीरा उजवा कालव्यात दिनांक १ रोजी रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक चार चाकी गाडी रस्त्याच्या अंदाज न आल्याने थेट कालव्यात गेली. चारचाकी गाडीतून एका महिलेला व युवतीला बाहेर काढण्यात आल्याने जीवितहानी टळली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लातूर येथील मात्र सध्या रांजणगाव येथे राहत असलेल्या जयश्री हनुमंत मुंडे व त्यांची मुलगी सुचिता हनुमंत मुंडे (मूळ रा कोष्ठगाव ता रेनापूर जि लातूर) या एम. एच १२ टी.व्ही ६१९७ या व्यावसायिक कार मधून चालकासह कर्नाटक येथे देवदर्शनाला गेल्या होत्या परतीच्या प्रवासात मुंडे रांजणगावला माघारी जात असताना सुरवडी गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्यावर आल्यावर या ठिकाणी दिशादर्शक फलक व कालव्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक नसल्याने गाडी तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने थेट कालव्यात गेली. यावेळी गाडीतील चालक हा लगेचच गाडीतून बाहेर निघाला पण एक महिला व युवती गाडीत तशीच होती.
कालव्याच्या पुलाच्या शेजारी असणाऱ्या झाडाच्या पारावर ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव व अभिजीत खोमणे हे दोघे बसले होते गाडी पाण्यात पडल्याचा आवाज येतात त्यांनी तात्काळ पुलावर धाव घेऊन गाडीच्या काचा फोडून पाण्यात बुडत असणाऱ्या गाडीतून जयश्री मुंडे व सुचिता मुंडे यांना बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला या ठिकाणी गतिरोधक व फुलाच्या संरक्षण खांबाची लांबी वाढविण्याची मागणी वारंवार नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे.
मागील तीन ते चार वर्षात कालव्यामध्ये चार चाकी पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे संबंधित विभागाने या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवून पुलाच्या संरक्षक खांबाची लांबी वाढवावी
नितीन जाधव,ग्रामपंचायत सदस्य सुरवडी
काळ आला होता पण...
जयश्री मुंडे व त्यांची मुलगी सुचिता मुंडे या गाडी पाण्यात पडल्यानंतर गाडीतच अडकून राहिल्या होत्या व गाडी हळू हळू पाण्यात बुडायला सुरवात झाली होती रात्रीच्या १२ वाजता या ठिकाणी युवक नसते तर मात्र फार मोठा अनर्थ घडला असता.