फलटण (प्रतिनिधी) — फलटणच्या राजकारणात गेली तीन दशकांहून अधिक काळ वर्चस्व राखणाऱ्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाला यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विधानसभेतील पराभवानंतर राजे गटाची राजकीय पकड ढासळल्याचे स्पष्ट संकेत आता नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसू लागले आहेत.
नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ सुरू झाली आहे. राजे गटातील माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक सोमशेठ जाधव, विक्रम जाधव, सनी अहिवळे, सुदामराव मांढरे, भीमदेव बुरुंगले यांच्यासह पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा तसेच इतरांनी घटक पक्षात केला आहे. हे सर्व प्रवेश रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याने “फलटण नगरपालिकेवर रणजितसिंह यांचा झेंडा फडकणार” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शहरातील तरुण, व्यापारी आणि उद्योजक वर्ग रणजितसिंह यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आणि आरोग्य विषयक अडचणी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी नवीन नेतृत्वाची गरज असल्याची भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.
राजे गटात नाराजी वाढली
रामराजेंच्या गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये अनेक मतभेद व नाराजी असून, अनेकांनी गट सोडण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या असंतोषामुळे राजे गटाचे संघटनात्मक बळ कमकुवत झाल्याचे मानले जात आहे. अनेक वर्षे निष्ठेने कार्य केलेले कार्यकर्ते आता अन्य गटांमध्ये जात असल्याने राजे गटाचे “कंबरडे मोडले” अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे.
रणजितसिंह यांचा वाढता प्रभाव
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखली असून, प्रत्येक प्रभागात स्वतंत्र संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यांनी शहरात विकासाचे नवे मॉडेल सादर करत तरुणांना राजकारणात आणण्याचे धोरण स्वीकारले आहे.
त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या घटकांमध्ये समन्वय वाढत असून, दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन प्रचाराची तयारी करत आहेत.
शहरातून उमटलेल्या प्रतिक्रिया
शहरातील नागरिकांमध्ये “आता बदल हवा”, “नव्या नेतृत्वाला संधी द्या” अशा प्रतिक्रिया उमटत असून, नगरपालिकेत बदलाची चाहूल लागल्याचे स्पष्ट होत आहे. काही ज्येष्ठ नागरिकांनी “दीर्घकाळ एका गटाने सत्ता उपभोगली, पण शहराचा विकास ठप्प झाला. आता रणजितसिंह यांच्या नेतृत्वातून नवे अध्याय सुरू होऊ शकतात” असे मत व्यक्त केले आहे.
एकंदरीत, फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा “राजे विरुद्ध रणजितसिंह” अशी थेट लढत रंगणार असून, पहिल्यांदाच राजे गटाच्या वर्चस्वाला गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो हे येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होईल; ऐन थंडीत मात्र शहरातील राजकीय वातावरण मात्र तापलेले दिसत आहे.



















