फलटण दि. १४ : सर्वसामान्यांचे प्रश्न प्रत्यक्ष भेटीत समजावून घेऊन या प्रश्नांची सोडवणूक केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी भाजपाने सातारा जिल्ह्यात पंचायत समिती गण निहाय दौऱ्याचे आयोजन केले आहे. दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी फलटण तालुका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या या दौऱ्यात खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, सातारा जिल्हा संघटक सरचिटणीस शेखर वडणे, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगसेवक अशोकराव जाधव, आघाडी मोर्चाचे मंडल अध्यक्ष व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आ. जयकुमार गोरे फलटण तालुका भारतीय जनता पक्ष संघटना मजबुत करण्याबरोबर लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी फलटण तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय गावांचा दौरा करणार आहेत, या दौऱ्यामध्ये लोकांच्या समस्या समजावून घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका पंचवार्षिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करणे, बुथ अभियान, बुथ सशक्तिकरण अभियान, केंद्र व राज्य शासनाच्या योजना सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचताहेत की नाही याची पाहणी करणे वगैरे उपक्रमांतर्गत सदर दौरा आयोजित करण्यात येत असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांनी कळविले आहे.
दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी आयोजित फलटण तालुका दौऱ्यानिमित्त केलेल्या नियोजनानुसार दि १७ रोजी सकाळी ८.३० वाजता दूधेबावी, सकाळी १० वाजता राजुरी कुरवली पाटी, ११ वाजता गुणवरे , १२.३० पवारवाडी, दुपारी २.३० राजाळे, दुपारी ४ वाजता विडणी, ५.३० वाजता कांबळेश्वर, सायंकाळी ७ वाजता साखरवाडी, ८.३० वाजता तडवळे, ९.३० वाजता तरडगाव.
दि. १८ रोजी सकाळी ८.३० वाजता निरगुडी, १२ वाजता बिबी, २ वाजता सासवड आणि सायंकाळी ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मंडल अध्यक्ष बजरंग गावडे यांनी केले आहे.