एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात संप सुरु आहे. कराड आगारात मंगळवार दि. १६ रोजी संपाचा नववा दिवस होता. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य प्रवाशांची आवडती लालपरी गेले नऊ दिवस आगारात उभी राहिली आहे.
कराड : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी सुरु असलेला कराड एसटी आगाराच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप नवव्या दिवशी सुरुच आहे. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, या संपाला समाजातील विविध संस्था व संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात संप सुरु आहे. कराड आगारात मंगळवार दि. १६ रोजी संपाचा नववा दिवस होता. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य प्रवाशांची आवडती लालपरी गेले नऊ दिवस आगारात उभी राहिली आहे. या संपकाळात आगारात एसटी कर्मचारी वेगवेगळ्या पध्दतीने दररोज निदर्शने, आंदोलन करुन आपल्या मागणीचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारीही आंदोलनस्थळी घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या संपला समाजातील संस्था, संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना टार्गेट करु नका
महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करावे, ही सर्व एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. मात्र परिवहन मंत्र्यांकडून रोजंदारी गट नं. १ मधील कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत, तर त्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्याचा इशारा दिला गेला आहे. हा अन्याय असून संप केवळ रोजंदारी कर्मचाऱ्यांचाच नव्हे, तर सर्वच एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांनाच टार्गेट करुन सेवा समाप्तीची भिती घालू नका.
- घनश्याम आवळे (रोजंदारी कर्मचारी)