फलटण प्रतिनिधी :
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या 9 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या एकसष्ठी निमित्तचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्रात होत असणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने स्थगित करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत करण्याचे आवाहन यावेळी माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील राजे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी संजीवराजे यांच्या एकसष्ठी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राज्यातील मराठवाड्या सह पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे शेतीचे नुकसान झाले आहे. जवळपास 22 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती यावेळी चव्हाण यांनी दिली.
अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले तर काही घरे वाहून गेली आहेत. सोलापूर जिल्ह्याचे उदाहरण घेतले तर दहा हजार पेक्षा जास्त कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यावरच मोठे संकट कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. माणुसकीची जाणीव ठेवून कुठेतरी आपल्याकडून पावसाने बाधित झालेल्या कुटुंबांना मदत झाली पाहिजे असे माजी आमदार चव्हाण म्हणाले.
शासन मदत करेलच मात्र फलटणचे राजघराणे अशा प्रसंगाच्या वेळी जिल्हा किंवा जिल्ह्याच्या बाहेर मदत करत असते. यापूर्वी ही सांगली जिल्ह्याला पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळीही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मदत देण्यात आल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस काही दिवसांसाठी स्थगित करून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येणार असल्याचे माजी आमदार चव्हाण यांनी सांगितले. तर धान्य, चारा, कपडे, ब्लॅंकेट अशा वस्तू तालुक्यातील जनतेने पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणेचे आवाहन ही शेवटी माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी केले आहे.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील तथा दत्ता अनपट, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, शंकरराव माडकर, बापूराव गावडे, जयकुमार इंगळे, दादासाहेब चोरमले आदि मान्यवर उपस्थित होते.