फलटण प्रतिनिधि -
महाराष्ट्र निमार्ण करण्यासाठी जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीतून कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या सारखा तरुण कार्यकर्ता आमदार झाला ही फलटणची परंपरा आहे. याच चळवळीतून यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले याचा ठराव मनमोहन पॅलेस फलटणला झाला हे राज्य तयार करण्याच्या मध्ये फलटणकरांचे योगदान महत्वाचे आहे. तुम्ही चिंता करू नका रामराजे इथं दिसत नसले तरी त्यांची मानसिकता काय आहे हे मी लोकसभा निवडणुकीत पाहिलं आहे. मागच्या दिवसात जे झालं ते झालं ते सगळं विसरून आपल्याला महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे असे सुतोवाच खा. शरद पवार यांनी केले. ते फलटण येथे जाहिर सभेत बोलत होते. यावेळी आ. दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मा. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील, खा. अमोल कोल्हे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. दिपक चव्हाण, कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, मा. आ. प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, मा. आ. उत्तमराव जानकर, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, जयकुमार इंगळे, रामभाऊ ढेकळे, अशोकराव लेंभे, सुनिल माने, यांच्यासह सातारा जिल्यातील विविध मान्यवर यावेळी उपास्थित होते.
पुढे बोलताना खा. शरद पवार म्हणाले, पाच सहा महिन्यात पूर्वीच्या भेटी या मध्ये खूप फरक होता. लोक आपले आहेत परंतू त्यांना अडचणी आहेत हे मला लक्षात आले. तुमच्या डोळ्यावरून तुमचं मन कळत तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत डोळे बोलके आहेत. आमचे संबंध अनेक वर्षांचे आहेत लहानपणी मी फलटणला येत असे माझ्या आईची एका ठिकाणी श्रद्धा होती त्यामुळे मी आई बरोबर नदी ओलांडून फलटणला येत असे तेव्हा पासून फलटणचे आणि माझे नाते असल्याचे खा. पवार यांनी निदर्शनास आणून दिले. आज बारामतीचे चित्र वेगळे दिसते त्यात विकास दिसतो माळेगाव साखरकारखान्याचा पाया श्रीमंत मालोजीराजे यांनी भरला त्यामुळे बारामती च्या विकासात फलटणचा वाटा आहे.असे पवार म्हणाले,
स्वतःच्या बहिणी बद्दल आस्था ही असतेच म्हणून बहीण ही जिवाभावाची आणि सर्वात महत्वाची व्यक्ती असते म्हणून बहिणींचा सन्मान केला. यात एक गंमत आहे बहीण दहा वर्षात आठवली नाही. देवेन्द्र फडणवीस यांचं सरकार असताना बहीण आठवली नाही मात्र आताच्या सरकारला लोकसभा निवडणुकीतील अपयशा नंतर लाडक्या बहिणीची आठवण झाली ही शोकांतिका असल्याचे खा. शरद पवार म्हणाले.
प्रास्ताविक करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, आपले राजकारण अपक्ष सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून आपण रामराजे यांच्या नेतृ्वाखाली पक्षाबरोबर आहे. राष्ट्रवादी संबंधी नको ते घडलं त्यावेळी रामराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आपण मनाने शरद पवार साहेबाच्या बरोबर होतो अशी भावना व्यक्त केली.
भाजपने फलटण तालुक्यातील राजकारण अस्थीर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वांच्या मतांचा आदर ठेऊन आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीत प्रवेश करतोय. आपली स्फूर्ती शरदचंद्र पवार व विजयसिंह मोहिते पाटील आहेत. येणाऱ्याविधानसभा निवडणूकीत अमिषे दाखवली जातील. साम,दाम,दंड, भेद वापरून निवडणूक लढविली जाईल. मात्र आज महाराष्ट्राला व देशाला पवार साहेबांच्या शिवाय पर्याय नाही. माजी खासदार यांनी फलटणचे इतरत्र पाणी नेहण्याचा प्रयत्न केला. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे यावेळी संजीवराजे म्हणाले.
मंत्री आणि आमदार विकत घेता येतात हे दिल्ली वाल्यांनी दाखवून दिले असल्याचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. हरियाणा सारखं महाराष्टात घडणार नाही कारण टायगर अभी जिंदा हैं असे म्हणत अमोल कोल्हे यांनी उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्रात आता तुतारी हाती घेण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे खा. कोल्हे म्हणाले. तर फलटणच्या मातीला मोठा इतिहास असल्याचे खा. कोल्हे यांनी निदर्शनास आणून दिले. आता राज्य सरकारच्या रोज नवीन योजना येत आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरोची होळी सरकार करत असल्याचा आरोप यावेळी खा. अमोल कोल्हे यांनी केला करतानाच भाजपाला आता जागा दाखवावी लागेल असे म्हणाले. लोकसभेत मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी अशी टिकाही महायुती सरकारवर कोल्हे यांनी केली. महागाई वाढली आहे त्यामुळे टॅक्स वाढवीला, हेलिकॉप्टर ला 5 % जि एस टी. तर शाळेच्या वहीवर 18 टक्के जि एस टी. अशी अवस्था झाल्याचे खा. कोल्हे म्हणाले. तुमच्या पैशाने गुजरातची भर होत असल्याचे जनतेला तुतारी हाती घेण्याचे आवाहन शेवटी खा. अमोल कोल्हे यांनी केले.
जिथं रामाची मंदिर तिथं भाजप उमेदवार पडले, देव जसा दिसत नाही तसं आज आपला राम या व्यासपीठावर दिसत नाही असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, तुम्ही परत स्वगृही परतणार असल्याचा विश्वास अगोदर पासूनच आपल्याला असल्याचे यावेळी जयंत पाटील म्हणाले. तुम्हाला किती त्रास झाला आहे हे मला माहिती असून संजीवराजेच्या माध्यमातून चांगला निर्णय झाल्याचे कौतुक पाटील यांनी केले. खा. धैर्यशील मोहिते - पाटील यांना विजयी करताना आपले योगदान राहिले आहे. आता पुन्हा एखादा केवळ फलटणच नाही तर खटाव - माण मतदार संघातील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर असल्याचे जयंत पाटील म्हणाले. कार्यकर्त्यांना भाजने त्रास दिला आहे. भ्रष्टाचाराचा कळस भाजपणे केला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला असल्याचे यावेळी जयंत पाटील म्हणाले.
आ.दिपक चव्हाण म्हणाले, महायुतीमध्ये गेल्या दिड वर्षात चांगला अनुभव आला नाही.फलटणच्या गुंडगिरी, दहशतवाद याला राज्यातील भाजप नेतृत्वाची साथ होती तर अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस केलेचे यावेळी निदर्शनास आणून दिले. कार्यकर्त्यांना किरकोळ कारणावरून 22 दिवस जेलमध्ये ठेवलं गेले त्यामुळे अशा सत्तेचा उपयोग काय असा सवाल यावेळी आमदार दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला. महायुतीत सन्मान कुठेच दिसला नाही त्यामुळेच आपण हा निर्णय घेतल्याचे आ. चव्हाण म्हणाले.
लोकसभा निवडणूकीत माझ्या मागे संजीवराजे यांची अदृश्य शक्ती होती आता हिच शक्ती उघड आपल्या बरोबर असल्याचे खा. धैर्यशील मोहिते - पाटील म्हणाले. पुढे बोलताना खा. मोहिते - पाटील म्हणाले, जनता हुशार आहे जनता यांना कंटाळली होती म्हणून मला मोठ्या संख्येने निवडून दिले. जनतेनं आता ठरवलं आहे पवार साहेबांच्या नेतृत्वात सर्व उमेदवारांना विधान सभेत पाठवायचे आहे. तर
माझ्या कडून ज्या अपेक्षा आहेत त्या मार्गी लावणार आहे. फलटण करांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा परिणाम सातारा जिल्ह्यात झाला पाहिजे अशी आपेक्ष यावेळी खा. मोहिते - पाटील यांनी बोलून दाखविली.












