राज्यातील काही शहरांमध्ये काल आणि आज काही लोकांनी एकत्र येऊन, जमाव जमवून आज दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार केले. कालपासूनच मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
सातारा : राज्यातील काही ठिकाणी काल आणि आज दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनेला जबाबदार असणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले असून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांची पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा येथे प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिला. महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, राज्यातील काही शहरांमध्ये काल आणि आज काही लोकांनी एकत्र येऊन, जमाव जमवून आज दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार केले. कालपासूनच मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या घटनांना जबाबदार असणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून राज्यातील जनतेने घाबरून जाऊ नये. अशा माथेफिरु प्रवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करावे. या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर कालपासूनच पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून मालेगाव प्रकरणात येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी मी सतत संपर्क साधत आहे. पोलिसांनी माळेगाव घटनेतील काही जणांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस सक्षम असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला.