राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कराड बस स्थानकाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून आगारातून दिवसभरात एकही बस सोडण्यात आलेली नाही.
कराड : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी राज्यभर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कराड बस स्थानकाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला असून आगारातून दिवसभरात एकही बस सोडण्यात आलेली नाही. तसेच जोपर्यंत आमची विलीनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
येथील बस स्थानकाबाहेर सोमवार दि. ८ रोजी कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच यावेळी बाहेरून कराड बस स्थानकावर आलेल्या एसटी बस अडवून कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, आंदोलनात सहभागी होत ठोस निर्णय होऊन संप मिटेपर्यंत कराड बस स्थानकावर एसटी बस न आणण्याच्या सूचनाही एसटी महामंडळाच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी संबंधित बस चालक, वाहकांना दिल्या. त्यानंतर बस स्थानकाच्या गेटवर थाबवलेल्या बस मार्गस्त करण्यात आल्या. यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी एसटी महामंडळाचे आंदोलक कर्मचारी आनंदा सावकार म्हणाले, राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपला विविध स्तरातून वाढता पाठींबा मिळत आहे. कराडमध्येही भारतीय जनता पक्ष, रयत क्रांती संघटना, जान फाऊन्डेशन यांच्यासह अनेक संघटना व लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास जाहीर पाठींबा दिला आहे.
सध्या, एसटी सेवा बंद असल्याने प्रवासी, गोरगरीब जनतेला हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. एसटी सेवा एक तासजरी बंद असल्यास त्याचा किती ताण निर्माण होतो, हे प्रशासनाच्या लक्षात आले पहिले. या संपामुळे खाजगी वाहनधारकांनी प्रवास्यांची लुट सुरु केली असून त्यांच्याकडून अव्वाच्या- सव्वा पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. राज्यभरात मुली, अपंग, जेष्ठ नागरिक यांच्यासह जवळपास ३०-३५ विविध सेवा गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ पुरवते. तरीही शासनाकडून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जात नसून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासन महामंडळाचे विलीनीकरण का करून घेत नाही? हाच प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांना पडला असून जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहितीही आनंदा सावकार यांनी यावेळी दिली.
दरम्यान, कराड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, दक्षिण तालुकाप्रमुख गजानन कुंभार, कराड शहप्रमुख जुनेद मोमिन, कार्याध्यक्ष गणेश सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. तसेच जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठींबा दर्शवला.
कामगारांवर दबाव टाकल्यास प्रत्युत्तर
जिल्ह्यात वेळोवेळी विविध कामगारांच्या प्रश्नांसाठी सह्याद्री श्रमिक कामगार महासंघाच्या वतीने लढा दिला आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याने काही अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांना कामावरून कमी करण्याबाबतच्या नोटीसीही बजावल्या जात आहेत. हे पूर्णपणे चुकीचे असून, असे झाल्यास योग्य निर्णय घेऊन प्रत्युत्तर देऊ. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास सह्याद्री श्रमिक कामगार महासंघ व पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा आहे.
- एकनाथ बागडी राज्याध्यक्ष, सह्याद्री श्रमिक कामगार महासंघ
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना मजुरी करणाऱ्या मजूरापेक्षा कमी पगार व 700 ते 1500 रुपये पेन्शन दिली जाते. कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिवसरात्र काम केले. त्यामध्ये महामंडळाचे 309 कर्मचारी कोरोनाने मृत झाले. तसेच कमी व अनियमित पगारामुळे 36 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. एवढी दयनीय अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची असतानाही गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नसून मागण्या मान्य करत नाही. त्यामुळे या सरकारचा जाहिर निषेध असून सरकारने तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.
- सचिन नलवडे जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना