येथील बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी संप पुकारला आहे. या संपचा आज तेरावा दिवस असून सरकारने अद्यापही मागणी मान्य न केल्याने संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन करुन सरकारचा तेरावा घालला. तसेच सरकारच्या नावाने बोंब ठोकून त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
कराड : येथील बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी संप पुकारला आहे. या संपचा आज तेरावा दिवस असून सरकारने अद्यापही मागणी मान्य न केल्याने संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडन करुन सरकारचा तेरावा घालला. तसेच सरकारच्या नावाने बोंब ठोकून त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
राज्यभरात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या एकाच मागणीसाठी लढा उभारत कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाचा आज सोमवारी २२ रोजी तेरावा दिवस असून कराड बसस्थानकासमोर आंदोलक कर्मचाऱ्यांनी सरकारचा तेरावा घातला. तेराव्याचा विधी करून शिंग फुंकून कामगारांनी बोंब ठोकली. तसेच ‘उंब्रजकरांचा दुखवटा, येवतीकरांचा दुखवटा’ म्हणत दुखवटा गोळा करून त्याचे पैसे सरकारला पाठविण्याचे ठरवले आहे.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या एकाच मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. गेल्या तेरा दिवसांपासून येथे बेमुदत संप सुरु असून चालक, वाहक व आगारातील इतर कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या संपला समाजातील विविध पक्ष व संघटनांचाही वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आमच्या इतर मागण्यांमधील काही मागण्या मान्य करायची तयारी दर्शवली आहे. मात्र, एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची आमची मुख्य मागणी सरकारने पूर्ण करावी. त्याशिवाय संप मागे घेणार नाही. त्यामुळे सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा, आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.