तालुक्यामध्ये गावा-गावांत असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मानाचं स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
दौलतनगर : पाटण मतदारसंघामध्ये राजकीय वाटचाल करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला, संघर्ष करावा लागला. असे असतानाही गावा-गावांमध्ये निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते यांची मजबूत फळी प्रत्येक गावांमध्ये निष्ठेने काम करत होती. काहीवेळा पराभव झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना नाहक त्रासही झाला. पण कार्यकर्ते डगमगले नाहीत. त्यांनी नाहक त्रास सहन केला. पण मनामध्ये संघटनेबाबतची निष्ठा कायम ठेवली. तालुक्यामध्ये गावा-गावांत असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मानाचं स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मारुलहवेली ते दिवशी बुद्रुक या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, ॲड. डी.पी.जाधव, ॲड. बाबूराव नांगरे, अधिक पाटील, संचालक पांडूरंग नलवडे, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, दादा जाधव, बाळासो सुर्यवंशी, अशोक सुर्यवंशी, सखाराम पाटील, बबनराव सुर्यवंशी, व्ही.जी.डोंगरे, बाळासो डोंगरे, प्रशांत चव्हाण, आनंदा पाटील, हणमंत सुर्यवंशी, श्रीमंत डोंगरे, टी.पी.कदम, एकनाथ गवळी, रामभाऊ महापूरे, प्रल्हाद महापुरे, भगवान महापुरे, राजाभाऊ सुर्यवंशी, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
ना. देसाई पुढे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावे व वाडया-वस्त्यामधील सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी व प्रगतीकरीता मंत्रीपदाच्या कालावधीत अनेक धाडसी निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावल पाहिजे हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. त्याकाळात नोकरीसाठी बाहेरगावी जाण्याची पध्दत होती,मिळेल त्या ठिकाणी मोल मजुरी करायची आणि कुटुंबाचा उदर-निर्वाह करण्याची मानसिकता माणसांच्यामध्ये होती.त्यामुळे खेडो-पाडयात शिक्षणाच्या सुविधा झाल्या पाहिजेत, त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातातून शेतकरी समृध्द झाला पाहिजे ही दूरदृष्टीचा त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांची होती. कोयना नदीवर 25 उपसा जलसिंचन उभारल्या.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या उपसा योजनांना मदत करुन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या उन्नतीकरीता स्व.लोकनेते साहेब व स्व. शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांनी त्या काळात प्रयत्न केला असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,पाटण तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यापासून आपण संघर्ष केला. दिवशी बुद्रुक सारख्या गावाचा विचार केला तर कै.शिवराम पाटील (नाना) व कै.प्रेमनाथ पाटील (तात्या) हे ज्येष्ठ कार्यकर्ते या गावांमध्ये संघटना टिकवण्याचे व वाढविण्याचे प्रामाणिक काम करत होते. निवडणूकींमध्ये पराभव झाला की या मंडळींना नाहक त्रास दिला जायचा,पण हे कार्यकर्ते डगमगले नाहीत. त्यांनी निष्ठा कायम ठेवली. परंतू दिवशी हे गाव विकासापासून वंचित का राहिलं याचाही सामान्य जनतेने विचार करणे गरजेचे आहे.सन 2004 साली आमदार झाल्यानंतर विरोधी बाकावर असतानाही 250 कोटींची विकास कामे केली. सन 2014 ते 2019 याकाळात 1800 कोटींची विकास कामे केली. त्यासाठी विकासाची दूर दृष्टी ठेवून काम करण्याची तळमळ असावी लागते.सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादने कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे सन 2019 साली पुन्हा आमदार झालो,मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृतवाखाली राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देत महत्त्वाच्या पाच खात्यांची जबाबदारी आपल्यावर पडली. माझ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये सादर केला. त्यानंतर कोविड 19 या आजारामुळे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले. असे असले तरी पहिल्या टाळेबंदीच्या काळात गृहविभागाची जबाबदारी 13 तर दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्हयांमध्ये दौरा केला. जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारी यांचे कामाचे ठिकाणी जाऊन त्यांच्या अडचणींची विचारपूस केली, त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला.
मंत्री झाल्यानंतर जनतेच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्याही अपेक्षा जबाबदारीने पूर्ण करण्याचं काम यापुढील काळात करायचे आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्या सामान्य शिवसैनिकांमुळे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे आपण या पदापर्यंत पोहोचलो आहे,त्या शिवसैनिकांना व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली आहे.मंत्रीपद हे लोकांची काम करण्यासाठी असून कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून सामान्य जनतेचे प्रयत्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. आपल्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे संस्कार असून त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा जोपासत सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याठी तसेच गावा-गावांतील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी वित्त राज्यमंत्री म्हणून आपल्या मतदारसंघाला विकास निधीमध्ये नेहमीच यापुढे झुकते माप दिले जाईल.तसेच दिवशी गावातील प्रलंबित विकास कामांसाठी भरघोस निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.
प्रास्ताविक दादा जाधव,स्वागत आप्पासो राक्षे यांनी केले तर आभार जालिंदर डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमास दिवशी बुद्रुकसह आसपासच्या गावातील, विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.