माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायीत्वाच्या भावनेतून सुरु असलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे सातारा सिव्हल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकां करीता वर्षातील 365 दिवस सुरु असणारा अन्नदान महायज्ञ. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित असलेला या उपक्रमाची दि. 1 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरुवात झाली आहे.
सातारा : सातारा शहरामध्ये माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायीत्वाच्या भावनेतून सुरु असलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे सातारा सिव्हल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकां करीता वर्षातील 365 दिवस सुरु असणारा अन्नदान महायज्ञ. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित असलेला या उपक्रमाची दि. 1 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरुवात झाली आहे. या उपक्रमाद्वारे रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय होत असल्याने त्यांना आपल्या व्याधीग्रस्त आप्तेष्टांच्या देखभाली करीता अधिक लक्ष पूरवता येते व त्यांच्या विवंचनेचा भार देखील काही प्रमाणात हलका होण्यास मदत होते.
गेले एक तप म्हणजेच 12 वर्ष हा उपक्रम माहेश्वरी चॅरीटेबल फाऊंडेशन ट्रस्ट, सातारा च्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्यातून यशस्वीरित्या राबला जात होता. पण अनपेक्षितरित्या उद्भवलेल्या व संपर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना महामारीचे सावट या अन्नदान महायज्ञाच्या उपक्रमावर देखील पडले. व या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये हा अखंड सुरु असलेला उपक्रम नाईलाजाने थांबवावा लागला. पण सध्या या परिस्थिीमधून आपण सर्वजणच हळू हळू सावरत असताना या उपक्रमाचे प्रमुख माधव सारडा जे स्वत: दररोज जिल्हा रुग्णालयातील या उपक्रमाध्ये लक्ष देऊन निटनेटके व्यवस्थापन करतात. सर्वांशी योग्य समन्वय राखत या उपक्रमाची जबादारी पारपाडत असतात, त्यांनी पुन्हा नव्या जोमाने या अन्नदान महायज्ञाचा सर्वांच्या सहकार्याने पुनश्च: हरीओम करण्याचा निर्णय घेऊन त्याची सुरुवात दि. १ नोव्हेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष कदम, मेट्रन चव्हाण मॅडम, प्रथम दिवसाचे अन्नदाते मा. आसिफ खान (मिस्त्री ) श्री राधेश्याम भंडारी, संदिप भट्टड, माननीय वासिम खान, जयश्री शेलार व उपक्रम प्रमुख माधव सारडा उपस्थित होते.
कोणतेही मोठे समाजोपयोगी कार्य जर सातत्याने सुरु ठेवायचे असेल तर त्यामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाखमोलाचा असतो. सर्वांच्या यथाशक्ती योगदानाने मग हा उपक्रम केवळ एका संस्थे पूरता मर्यादित न राहता, त्याला व्यापक सामजिक स्वरुप येते. म्हणूनच माहेश्वरी चॅरीटेबल फाऊंडेशन ट्रस्ट तर्फे सर्व सातारकर नागरीक, संस्था, व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की, या अन्नदान महायज्ञामध्ये आपण अधिकाधिक सहभाग नोंदवावा. कारण आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले आहे. अन्नसेवा म्हणजे साक्षात नारायणसेवाच समजली जाते. कारण भूकेल्यासाठी अन्नाचे मोल हे शब्दातीत आहे. आपल्या या उपक्रमातील सहभागामूळे शासकिय रुग्णालयात दाखल कित्येक रुग्णांच्या नातेवाईकांना कठीण काळामध्ये दिलासा देण्याचे कार्य आपल्या हातून घडणार आहे. तरी आपण आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, शुभ प्रसंगाच्या निमित्ताने किंवा आपल्या आदणिय व्यक्तीच्या स्मृतिदिनानिमित्त या अन्न सेवेमध्ये आपले यथोचित योगदान देऊ शकता. सामाजिक जाणिवेचे भान समस्त शाहूवासियांना खूप चांगल्या प्रकारे असल्याने सर्वांच्या सहकार्याने माहेश्वरी चॅरीटेबल फाऊंडेशन ट्रस्टने गेली 12 वर्षे हा उपक्रम यशस्वी पार पाडला आहे. तरी पुन्हा एकदा समस्त सातारक शहरवासीयांनी या उपक्रमात मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले. ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी माधव सारडा, अन्नसेवा उपक्रम प्रमुख - फोन : 9822078768 यांच्याशी तसेच अध्यक्ष व संपूर्ण ट्रस्टी मंडळ, माहेश्वरी चॅरीटेबल फाऊंडेशन ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.