महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचे मोठे योगदान असून यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, आबासाहेब वीर, आर.डी.पाटील, बाळासाहेब देसाई व इतर धुरिणांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
सातारा : महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचे मोठे योगदान असून यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, आबासाहेब वीर, आर.डी.पाटील, बाळासाहेब देसाई व इतर धुरिणांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय, सातारा येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते.
डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व सहकार सप्ताह शुभारंभ हा दुहेरी संगम असून सहकार अधिक बळकट करण्याची जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. भारत देशाचे तुलनेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणांत सहकार चळवळ वाढली असून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. सातारा जिल्हा बँक सहकारातील दीपस्तंभ असून सद्या सहकारापुढे अनेक अडी-अडचणी असून, तीव्र स्पर्धेला सामोरे जावून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. बँकेचे मा. संचालक मंडळ सदस्य यांनी आखून दिलेली ध्येय धोरणे यांची प्रभावी अंमलबजावणी बँकेचे अधिकारी, सेवकवर्ग करत असतात. सेवकांनी सहकाराची तत्वे समजून घेवून अधिक प्रभावीपणे कामकाज करावे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा बँकेस मोठी परंपरा असून बँकेचे कामकाज आदर्शवत आहे. बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या कर्ज योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. त्यांची परिणामकारक अंमलबजावणी अंतिम घटकांपर्यंत यशस्वीपणे झालेचे दिसून येते. तव्दतच जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना दुष्काळ, अतिवृष्टी, जनावरांची छावणी, तसेच कोरोनाच्या काळात आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटपासह यावर्षीही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करण्यासाठी रु ३.०० कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
अन्य अडचणीच्या काळांत बँकेने सर्वतोपरी मदत केलेली असून त्याचा फायदा शेतकरी सभासदांना झालेला आहे. यामधून चांगली सहकारी चळवळ या जिल्ह्यात रूजली आहे. बँकेने ग्राहकांसाठी युपीआयची सुविधा सुरु केलेमुळे ग्राहकांना गुगलपे, फोनपे, पेटीएम, जिओ मनी द्वारे खरेदी व्यवहार करणे, फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, ई-कॉमर्स, रक्कम वर्ग करणे इत्यादि सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. बँकेच्या QR कोडचा वापर केलेने व्यवहार झाल्यानंतर क्षणार्धात ग्राहकाच्या खात्यावर व्यवहाराची रक्कम वर्ग होत आहे. जिल्हा बँकेच्या युपीआय सुविधेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकरी, व्यावसायिक, सभासदांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
याप्रसंगी सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे , सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विभाग प्रमुख व सेवकांचे उपस्थितीत सहकार ध्वजाचे ध्वजारोहण झाले. सहकार ध्वजाला मानवंदना दिली. बँकेचे कार्यालयांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.