सातारमधील संध्या चौगुले यांनी उभारलेली ही हिरवाई म्हणजे सह्याद्री देवराईची आई आहे. हिरवाईने देवराईला जन्म दिलाय. यातूनच सह्याद्री देवराईची संकल्पना प्रत्यक्षात उतरली, असे मत सह्याद्री देवराईचे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
सातारा : सातारमधील संध्या चौगुले यांनी उभारलेली ही हिरवाई म्हणजे सह्याद्री देवराईची आई आहे. हिरवाईने देवराईला जन्म दिलाय. यातूनच सह्याद्री देवराईची संकल्पना प्रत्यक्षात उतरली, असे मत सह्याद्री देवराईचे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
सदर बझार येथील हिरवाई प्रकल्पामध्ये पांडुरंग चौगुले स्मृतीदिनानिमित्ताने ते बोलत होते. यावेळी हिरवाईचा ११ वा पांडुरंग चौगुले पुरस्कार सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रणेते सयाजी शिंदे यांना ज्येष्ठ करसल्लागार व चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, मी पहिल्यांदा हिरवाई पाहिली त्याचवेळी माझ्या मनात आपणही झाडे लावावीत, असा विचार रुजला. त्यानंतर संध्या चौगुले यांना माझे गाव वेळेकामठी येथे घेऊन गेलो होतो. तेव्हा त्यांनी महिलांची जबाबदारी घेऊन परसबागेत झाडे कोणती व कशी लावायची याबाबत मार्गदर्शन केले. हे काम करताना किती त्रास होतो आणि किती कष्ट करावे लागतात हे सर्व आपण ऐकतो पण जाऊ द्या. संध्याच्या आयुष्यातच पांडुरंग आहे आणि आता झाडे हाच त्यांचा पांडुरंग आहे. चिंता करण्याचे काही कारण नाही. तुझेच काम घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. खरे तर हे काम सर्वांचेच आहे. पुरस्कार वगैरे मला तितके महत्त्वाचे वाटत नाहीत. असे पुरस्कार घेणारे किंवा इतर सेलिब्रिटी ऑक्सिजन देतात का? सावली देऊ शकतात का? झाडेच आपल्याला ऑक्सिजन देतात. झाडेच मोठे सेलिब्रिटी आहेत. झाडांपुढे आपण नतमस्तक असले पाहिजे. तुमची संपत्ती, मोठेपण हे त्यापुढे काहीच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपण वृक्ष बँक तयार करणार आहोत. वृक्ष बँकेतील ही झाडे मोठी होतील तसतसे ते आपल्याला व्याज देत राहतील. यातून शाळा-शाळांपर्यंत, मुला-मुलांपर्यंत झाडे आणि त्यांचे संगोपन करण्याची जाणीव पोहोचवणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
पांडुरंग चौगुले आणि संध्या चौगुले यांचे काम आम्ही गेल्या वीस वर्षांपासून बघत आहोत, असे चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांनी सांगितले. हिरवाई प्रकल्पाद्वारे अनेक ठिकाणी झाडे लावण्याची एक चळवळ त्यांनी उभी केली आणि या कामाशी आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिलो आणि जिल्ह्यातील मान्यवर आणि ज्येष्ठ लोकांनी हिरवाई ला पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सोमनाथ साबळे म्हणाले, हिरवाईकडे आम्ही सातारकर वृक्षारोपणाचे एक मॉडेल म्हणून पाहतो. आपण सर्वांनी हिरवाई आणि देवराईच्या झाडे जतन करण्याच्या चळवळीत खारीचा वाटा उचलूया. धनंजय शेडबाळे, सुजित शेख यांनीही मनोगत व्यक्त केले.
संध्या चौगुले यांनी प्रास्ताविकात हिरवाईच्या माध्यमातून चालणाऱ्या कामांचा आढावा घेत पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कार देण्यामागची भूमिका सांगितली.
या वेळी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सौ. नीलम आणि समीर मोहिते, वृक्षारोपण व संगोपन करणाऱे, धनंजय चौगुले, वैभव लोटके, सुमीत मतकर, दुर्गळवाडीचे ग्रामस्थ, न्यू इंग्लिश स्कूल अंगापूरचा स्टाफ, पांडुरंग साळुंखे, जि.प.शाळा कटापूरचे आदर्श शिक्षक सुभाष जाधव अशा वृक्ष संगोपन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सत्कार घेण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार तानाजी मस्के यांनी मानले. सूत्रसंचालन वनिता वाळके यांनी केले. यावेळी बाळासाहेब बाबर, डॉ. शिल्पा साबळे, गणेश बकरे, राजेंद्र राजपूत, चांदनी शिंदे, धनंजय कारंजकर, स्नेहल कदम, वनिता कदम, सरिता शिंदे, मनीषा मोरे, अनिल भुजबळ, दत्तात्रय कणसे, प्रताप पवार, सर्जेराव पाटील, मनुवेल गावित, शैलजा पाटील, राहुल भेलावे, रमेश भारमळ आदी मान्यवर उपस्थित होते.