राजवाड्यावर प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी युवकांनी रिक्षा चालकाच्या डोक्यात रॉड मारून त्यांची रिक्षा पळविल्याची घटना सातारा तालुक्यातील सैदापूर येथे दि. 8 रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.
सातारा : राजवाड्यावर प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी युवकांनी रिक्षा चालकाच्या डोक्यात रॉड मारून त्यांची रिक्षा पळविल्याची घटना सातारा तालुक्यातील सैदापूर येथे दि. 8 रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी संशयित युवकांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सिराज अब्दुलकादर बागवान (वय 54, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) हे रिक्षा चालक असून, दि. 8 रोजी अकरा वाजता ते राजवाड्यावर रिक्षा घेऊन प्रवाशांची वाट पाहात उभे होते. यावेळी तीन युवक तेथे आले. त्यांनी बागवान यांना सैदापूर येथे जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर बागवान यांनी रिक्षा सुरू केली. रात्री सव्वा अकराच्या सुमारास बागवान हे कोंडवे येथे पोहोचल्यानंतर अजून पुढे सोडा, असं त्या युवकांनी सांगितलं. त्यामुळे बागवान यांनी डांबरी रस्त्यावरून रिक्षा कच्च्या रस्त्यावर नेली. काही अंतर पुढे गेल्यानंतर निर्जन ठिकाण पाहून पाठीमागे बसलेल्या एका युवकाने बागवान यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यावेळी त्यांच्या खिशातील सातशे रुपये, मोबाईल आणि रिक्षा घेऊन संबंधित युवक तेथून पसार झाले.
मारहाणीत गंभीर जखमी झालेले बागवान हे तशाच अवस्थेत चालत डांबरी रस्त्यावर आले. तेथील पोलीस चौकीत जाऊन त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. ते जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सात टाके पडले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी कोंडवे, सैदापूर परिसरात चोरट्यांचा शोध घेतला असून, शाहूपुरी येथील एका शाळेसमोर पोलिसांना रिक्षा सापडली. मात्र, चोरटे अद्याप सापडले नाहीत.