फलटण |धैर्य टाईम्स | २२ एप्रिल २०२५
फलटण शहराचे दोन दिवसांपूर्वी सर्वाधिक ४१ अंशावर असलेले तापमान मंगळवारी ४२ अंशावर गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान आहे. मंगळवारी तीव्र उष्णतेबरोबरच दिवसभर तीव्र उष्णतेच्या झळा जाणवत होत्या. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उष्णतेच्या झळा वाढत आहेत. मात्र या बाबत नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी हे अजूनही प्रशासनाने स्पष्ट करण्यात आले नाही. अशा वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. मात्र प्रशासनाला नागरिकांची काळजी आहे का ? उष्माघातासारखा प्रकार घडल्यास प्रशासनाकडून कोणती उपाययोजना केल्या पाहिजेत हे काही समजत नसल्याने फलटणच्या नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
मार्च महिन्यात ३७ ते ३९ अंश तापमान नोंदविले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मात्र ढगाळ वातावरणाबरोबरच अवकाळी पावसामुळे तापमान घटले. एप्रिललाच्या पहिल्यां आठवड्यात शहराचे तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यात शहराचे तापमान ३९ अंशावर कायम होते. मंगळवारी मात्र शहराच्या तापमानात वाढ होऊन ते ४२ अंशावर गेले. प्रशासनाकडून नागरिकांसाठी कोणताही अलर्ट जारी करण्यात आला नाही.
उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान बाहेर जाणे टाळावे. पुरेसे पाणी घ्यावे, बाहेर पडताना छत्री, टोपीचा वापर करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात. गरोदर महिला, वृद्धांनी अधिक काळजी घ्यावी, उन्हात अति कष्टाची कामे टाळावी, उच्च प्रथिनयुक्त आहार घेण्याची सूचनाही तज्ञांकडून दिली जात आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही.
शहरात वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. मंगळवारी तापमान चाळिशीपार पोहोचले.
मात्र ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृद्ध, गर्भवती, लहान बालकांना विशेष काळजी घेण्याची गरज असताना जिल्हा आरोग्य विभगाकडून जनजागृती अथवा उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.
भर उन्हात दुचाकीवर फिरताना त्वचेला दाह होतो. संपूर्ण शरीर झाकेल असे कपडे वापरा. भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी घरगुती शीतपेये घ्यावी. लस्सी, लिंबू-पाणी, ताक, उसाचा रस प्यावा. उन्हात फिरल्यावर अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर जाणवल्यास डॉक्टरांना दाखवा. घराबाहेर पडताना गॉगल, छत्री / टोपी, बुटांचा वापर करावा. प्रवासात पाण्याची बॉटल सोबत ठेवा असाही सल्ला तज्ज्ञ डॉक्टर सुभाष गुळवे यांनी दिला आहे.