सातारा- कास मार्गावर आज सायंकाळी उशिरा अचानक लागलेल्या वणव्यात सुमारे एक एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
सातारा : सातारा- कास मार्गावर आज सायंकाळी उशिरा अचानक लागलेल्या वणव्यात सुमारे एक एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची माहिती कळताच परिसरातील १० ते १२ युवकांनी आपला जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणल्याची माहिती सातारा तालुका वन विभागाचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली. दरम्यान, वणवा कोणीही लावू नये त्यामध्ये फार मोठी नैसर्गिक साधन संपत्ती आणि अत्यंत दुर्मिळ कीटक, पक्षी जळून नष्ट होतात. यापुढे वणवा लावणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
निवृत्ती चव्हाण पुढे म्हणाले, सातारा- कास मार्गावर गणपती मंदिराच्या पुढील बाजूस एस कॉर्नरजवळ पुलाच्या बाजूला असणाऱ्या क्षेत्रामध्ये अज्ञात इसमाने वणवा लावला. याबाबतची माहिती मिळताच त्या परिसरातील १० ते १२ युवकांनी तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र जोरदार वाऱ्यामुळे आगीने रुद्र रूप धारण केले. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच वनपाल दशरथ फाळके, वनरक्षक संजय धोंडवळ, मारुती माने, गोरख शिरतोडे, संतोष दळवी यांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित युवकांना आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात स्थानिक युवक व वन विभागाच्या आग नियंत्रण पथकाला यश आले. मात्र तोपर्यंत दुर्दैवाने सुमारे एक एकर क्षेत्राचे आगीमुळे नुकसान झाले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्ती आणि अनेक कीटक, दुर्मिळ वनौषधी जळून खाक होतात. त्यामुळे खाजगी अथवा वन विभागाच्या क्षेत्रात कोणीही वनवा लावू नये, भविष्यात असा प्रकार घडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येणार आहे.