फलटण प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘दीपस्तंभ पुरस्कार’ यंदा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट कामकाज, उत्तम व्यवस्थापन, सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान, ठेवींमध्ये सातत्यपूर्ण वाढ, आदर्श कर्जवाटप व वसुली, शून्य एनपीए तसेच सर्व नियमांचे काटेकोर पालन या निकषांवर संस्थेची निवड करण्यात आली.
हा पुरस्कार सहकार भरतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते संस्थेचे संचालक अभिजीत शिंदे, अतुल पवार व व्यवस्थापक संदीप सस्ते यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना उदय जोशी म्हणाले की, संस्थापक जयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्था अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्य करत आहे. सभासद, ठेवीदार व कर्जदारांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून संस्थेच्या माध्यमातून बहुतांश सेवा ऑनलाईन स्वरूपात देण्यात येत आहेत. भविष्यातही ही संस्था ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक डॉ. रविंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, पतसंस्थेच्या उपाध्यक्षा पुनम माने, संचालक ॲड. वैशाली गाडे, कल्याणी घोरपडे, आप्पा डुबल, शंकर कांबळे गुरुजी, यशवंत कारंडे, विकास सस्ते, डॉ. सूर्यकांत दोशी, शिवाजी कोकरे, गोरख जाधव, व्यवस्थापक संदीप सस्ते तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या सन्मानामुळे प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून सभासद व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.










