सातारा, दि.31 : आयडीबीआय ग्रामीण प्रशिक्षण संस्था (आरसेटी ) सातारा यांच्या वतीने संस्थेत प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय यशस्वीपणे सुरु करणाऱ्या माजी प्रशिक्षणार्थींचा संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला.
यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक शमाकांत शेडगे, काटदरे उद्योग समूहाचे व्यवस्थापक पराग काटदरे, आयडीबीआय आरसेटीचे संचालक श्री प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
आरसेटीच्या उपक्रमाचे कौतुक करुन नव उद्योजकांनी नवनव्या संधी शोधून आपल्या समस्यांतून मार्ग काढावा व यशस्वी उद्योजक व्हावे, असे जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. शेडगे यांनी यावेळी सांगितले.
आपल्या मनोगतात काटदरे उद्योग समूहाचे श्री. काटदरे यांनी आपले उद्योजकीय अनुभव सांगताना सुरुवातीस छोट्या प्रमाणात उद्योगाची सुरुवात करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून सतत आपल्या उद्योगाची वाढ करावी असे सांगितले.
आयडीबीआय आरसेटीचे संचालक श्री पाटील यांनी या संवाद मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका विशद करताना संस्थेतील प्रशिक्षित नव उद्योजकांना आपल्या अनुभवाची देवाणघेवाण करता यावी, आपल्या व्यवसायाशी निगडित पूरक माहिती घेता यावी हा या संवादमेळाव्याचा उद्देश असल्याचे प्रस्ताविकात सांगितले.
मेळाव्यात आरसेटीचे प्रशिक्षक श्री. सुहास साळुंखे यांनी आरसेटीच्या गुरुदक्षिणा या उपक्रमाची माहिती दिली व अधिकाअधिक गरजूंपर्यत हा उपक्रम पोहचविण्याचे आवाहन केले.
या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या नव उद्योजकांनी आपले उद्योजकीय वाटचालीतील अनुभव व्यक्त केले. तसेच आयडीबीआय आरसेटीच्या या उपक्रमाचे कौतुक करून या संवाद मेळाव्यातून त्यांना खूपच फायदा झाला असून असा मेळावा आरसेटीने नियमित आयोजित करावा अशी विनंती केली.
या संवाद मेळाव्याच्या यशस्वितेसाठी आयडीबीआयचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.