वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही ग्रामीण भागातील गावे फलटण शहर व उपनगरातील वीज पुरवठा यंत्रणामध्ये जोडल्याने विज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. मात्र आमचे वरिष्ठ अधिकारी या संदर्भामध्ये आमचा कोणताही हस्तक्षेप मान्य करीत नाहीत. त्यामुळे फलटण शहर व उपनगराला विजेचा लपंडाव सातत्याने सामोरे जावे लागत आहे : बाळू लोंढे
फलटण प्रतिनिधी –
सध्या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर व उपनगरांमध्ये वारंवार वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरासोबतच जोडलेल्या उपनगरांमध्येही विजेचा लपंडाव सातत्याने सुरू असल्याने दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. याबाबत माहिती देताना सहाय्यक उप अभियंता बाळू लोंढे यांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील काही गावे फलटण शहराच्या वीज पुरवठा यंत्रणेशी जोडण्यात आली आहेत. त्यामुळे शहर व उपनगरांवर अतिरिक्त ताण येत असून, वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना घडत आहेत.
“या निर्णयामध्ये स्थानिक पातळीवर आमचा कोणताही हस्तक्षेप मान्य केला जात नाही. वरिष्ठ स्तरावरच सर्व निर्णय घेतले जात असल्याने आम्हाला परिस्थितीवर ठोस उपाययोजना करता येत नाही,” असेही लोंढे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सततच्या वीज खंडितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.










