माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासने अल्प काळातच पूर्णत्वाकडे चालली असून खासदार रणजितसिंह यांनी आपणास टिका - टिप्पणी करण्यात वेळ न घालवता फलटण तालुक्याचा विकास करायचा असे विधान करीत विरोधकांना चितपट केले व तालुक्यातील जनतेची मने जिंकली असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपा फलटण तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे व शहराध्यक्ष अमोल सस्ते कळविले आहे.
मागील वर्षी कोविड - 19 मूळे अनेक विकासकामे करताना मर्यादा होत्या. राज्यात भाजपचे सरकार नसल्याने निधीला मर्यादा होत्या. मात्र आता केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने शेती, पाणी, आरोग्यसेवा, रस्ते, रेल्वे, नाईकबोमवाडी एमआयडीसी व इतर पायाभूत सुविधांन करीता खासदार सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कामाने फलटण तालुक्यातील जनतेला नवीन आशेचा किरण दिसत असून जनतेची साथ खासदार निंबाळकर यांना मिळत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी अवस्था फलटण तालुक्यातील जनतेची झाली होती. संपादित जमिनी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या, पुनर्वसन फलटण तालुक्यात, निधी सातारा जिल्ह्याचा आणि ते पाणी मात्र इतरांना अशी अवस्था या पूर्वी झाली होती.
कालवे पूर्ण होऊ नयेत म्हणून राजकीय व शासकीय कागदी घोडे नाचवून फलटण च्या जनतेला व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम तब्बल 20/25 वर्षे सातत्याने सुरू होते, काही काळ अपवाद वगळता फलटणच्या जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागला होता, मात्र ना.देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होताच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतीच्या पाण्यासाठी वणवण थांबवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होते, अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि नीरा - देवघर प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळून 3200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल असे सातारा जिल्हा सुपुत्र मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सांगत खासदारांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण केली.
तालुक्यातील युवकांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी जुनीच मागणी असलेल्या नाईकबोमवाडी एमआयडीसी चे स्वप्न अखेर सत्यात उतरवले. या प्रकल्पामध्ये 20 हून अधिक मल्टिनॅशनल कंपनी असल्याने तालुक्यातील तब्बल 4 हजार हुन अधिक नोकऱ्या उपलब्ध असणार आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांसाठी मोठे रुग्णालय गरजेचं असल्या कारणाने राज्य शासनाकडे पाठपुरावा करून 65 कोटी रुपये मंजूर करून घेतले व लवकरच त्याचा आराखडा होऊन कामाला सुरुवात होईल. आळंदी - पंढरपूर महामार्ग मंजूर झाल्यामुळे अनेक वारकरी या मार्गाने पढरपूर कडे जात असतात या वारकऱ्यांसाठी फलटण तालुक्या मध्ये दोन वारकरी भवन मंजूर झाले असुन लवकरच कामाला सुरुवात होईल असे भाजप तालुका अध्यक्ष पै.बजरंग गावडे व शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.