सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी सन 2014 पर्यंत 49.04 कि.मी. होती तर आता ही लांबी 858 कि.मी. झाली आहे. तर आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटींचा पालखी मार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पालखी मार्गाचे महाराष्ट्रातील साधुंसंताच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. हा उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा केला जाईल असे यावी ना. नितीन गडकरी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र ऊस उत्पादनात अग्रेसर आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मिती करता येते. पेट्रोलपेक्षा इथेनॉलचे दर खूप कमी आहेत. पुढील काळात इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यात येणार आहे. तरी साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
फलटण येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे उंडवडी कडेपठार-बारामती-फलटण रस्ता चौपदरीकरण व कॉक्रिटीकरण, शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट रस्ता राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरणाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण आणि लोणंद-सातारा रस्ता मजबुतीकरणाचे लोकार्पण डिजिटल पध्दतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर, दीपक चव्हाण, शहाजी पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक समीर शेख, राष्ट्रीय महामार्गाचे संतोष शेलार आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी सन 2014 पर्यंत 49.04 कि.मी. होती तर आता ही लांबी 858 कि.मी. झाली आहे असे सांगून श्री. गडकरी म्हणाले, आळंदी ते पंढरपूर हा बारा हजार कोटींचा पालखी मार्ग येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या पालखी मार्गाचे महाराष्ट्रातील साधुंसंताच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. हा उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य दिव्य असा केला जाईल.
मुंबई - बेंगलोर महामार्गावर विविध सुविधांसह औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक युवकांना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला भाव मिळणार यामुळे या भागातील स्थालांतर कमी होईल. केंद्र शासनाचा देशभरात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यावर भर राहिला आहे.
महाराष्ट्राला ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे. संत वाङमय हे डिजिटल पध्दतीने तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री. गडकरी म्हणाले, फलटण शहरांतर्गत 9 कि.मी. चा रस्ता पूर्ण केला जाईल.फलटण -दहिवडी या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करुन सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. तसेच लोकप्रतिनिधींनी विविध विकास कामांना निधीची मागणी केली आहे. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय महामार्ग महामंडळाचे काम जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरु असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी सांगितले.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, पालखी मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पालखी मार्गासाठी जमिन संपादन केलेल्या लोकांना योग्य मोबदला देण्यात आला आहे.. माढा लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामासाठी गडकरी साहेबांनी नेहमीच सहकार्य केले आहे.फलटण शहरातील विकास कामांनाही निधी मिळवा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
खासदार रणजितसिंह म्हणाले, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फलटणमध्ये एवढी मोठी भव्य सभा ही गडकरी साहेबांची होत आहे. मी खासदार झाल्यापासून ना. गडकरी यांनी या भागातील रस्ते विकास व अन्य कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि तीच कामे आज साकारताना दिसत आहेत. एकदा शब्द दिला की, तो पूर्ण करण्याचे काम गडकरी साहेब करीत असतात. त्यांच्याकडे एकदा कामासाठी गेल्यावर पुन्हा फॉलोअपसाठी जावे लागत नाही. राज्यातील वारकऱ्यांची व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्या लक्षात आली होती. पालखी महामार्गाची फाईल पूर्वी प्रलंबित होती; त्यासाठी गडकरी साहेबांकडे गेलो, साहेबांनीही तातडीने सांगितले की खासदारजी फाईल पूर्ण होईल. फलटण शहरामधून जो पालखी मार्ग जात आहे; त्याचे सुद्धा प्रलंबित काम आपण करावे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
ज्या विमानतळावर आपण उतरलो त्या ठिकाणचा हवाईमार्ग दुरुस्त करावा. फलटण तालुक्यातील शेरेचेवाडी व सुरवडी येथे ओव्हर ब्रिज मंजूर करावा. पालखी महामार्गामुळे अर्धा रिंग रोड झाला आहे; त्याला पूर्ण करून संपूर्ण रिंग रोड करावा, अशी मागणी फलटणकरांसाठी करत असताना विकासकामांचा डोंगर उभा राहत असून आम्हाला तो डोळ्यांनी बघायला मिळणार आहे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
आमदार रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, फलटण ह्या ऐतिहासिक नगरीमध्ये आपले प्रथमच आगमन झाले असेल. प्रमोद महाजन हे फलटणमध्ये येऊन गेल्याचे आठवते. शहाजी बापू माझी भीती तुम्हाला वाटते हेच एकदम ओके आहे. आपण मूळ कोणत्या पक्षाचे आहोत, आपण आधी अपक्ष आहोत, मग काँगेस, मग मी पुढं काही सांगणार नाही... असा विनोद करत गडकरी साहेब मला ह्या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल आभार. ९५ साली जेव्हा मी माझे काम घेऊन गडकरी साहेबांकडे गेलो होतो; तेव्हाच त्यांनी मला सांगितलं की आता माझ्याकडे फॉलोअपसाठी येणाची आवश्यकता नाही. आज सुद्धा दिल्लीमध्ये आपण गेलो तरी गडकरी साहेब ते काम मार्गी लावतात. फलटण तालुक्यातून ग्रीन हायवे चालला आहे; तो अतिशय गरजेच्या वेळी तुम्ही करत आहात. सातारा जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीची बैठक आपण कुठेही घ्यावी, त्या बैठकीला आम्ही येऊ असे सांगत नितीन गडकरी जे काम करीत आहेत ते पाहिल्यानंतर मला शरद पवार साहेबांची आठवण येते. पवार साहेब जेव्हा ज्या प्रमाणे दिल्ली येथे मंत्री म्हणून काम करत होते त्याच प्रमाणे नितीन गडकरी हे काम करीत असल्याचे रामराजे यांनी निदर्शनास आणून दिले.
शहाजी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.