फलटण : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यामधून जे मताधिक्य मला मिळालेले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये फलटण तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामुळे श्रीमंत रामराजे व त्यांच्या दोन्ही बंधूंसह संपूर्ण राजे गटाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असल्याची बोचरी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील संपर्क कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रणजितसिंह बोलत होते. यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, युवा नेते धनंजय साळुंखे - पाटील, रणजितसिंह दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह म्हणाले की; नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माझा पराभव करण्यासाठी श्रीमंत रामराजे यांच्यासह त्यांच्या दोन्ही बंधूंनी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. त्यामध्ये त्यांना यश आले असले तरीसुद्धा फलटण तालुक्याने आता राजे गटाला नाकारले आहे. याचे कारण म्हणजे लोकसभेला फलटण तालुक्यासह विधानसभा मतदारसंघांमधून जे मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात सर्वसामान्य नागरिकांनी दिलेआहे; त्यामुळे यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
यावेळी फलटण येथील विमानतळ या जागेसाठी विरोधकांनी केलेले अर्ज व त्याची कागदपत्रे पत्रकार परिषदेत मांडत त्यांनी श्रीमंत रामराजे व त्यांच्या बंधूंवर जोरदार हल्ला चढवला असून श्रीराम सहकारी साखर कारखाना व खाजगी दूध प्रकल्पाच्या सांडपाण्यामुळे खडकेश्वर ओढा व त्यानंतर बाणगंगा नदी प्रदूषित कशी होते याचा व्हिडीओ दाखवत स्वराज कारखान्यावर केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर दिले
यावेळी नीरा देवधर प्रकल्पाचे काम सुरू असून त्याचे दिनांक २४ जुलै रोजीचे चित्रीकरणही पत्रकार परिषदेत माजी खासदार रणजितसिंह ना निंबाळकर यांनी मांडले या प्रकल्पाचे व टेंडरचे रक्षण करण्याचे काम आता तालुक्याच्या आमदारांनी करावे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्ही दिवस रात्र काम केले आहे फलटण तालुक्याच्या जनतेसाठी या प्रकल्पाचे रक्षण आमदारांनी करावे अशी मागणी ही निंबाळकर यांनी केली
पुतणा मावशीचे प्रेम दाखवू नये
नीरा देवधर प्रकल्पाबाबत सुप्रिया सुळे यांनी पुतणा मावशीचे प्रेम दाखवू नये कारण आज वर नीरा देवधरचे पाणी बेकायदेशीर पणे बारामतीकरांनी वापरले आहे एकाने मारायचे व दुसऱ्याने रडायचे हे नाटक आता फलटण तालुक्यातील नागरिकांना कळले आहे त्यांनी या प्रकल्पाबाबत दाखवू नये असा टोला माजी खासदारांनी पत्रकार परिषदेत लावला आहे