फलटण प्रतिनिधी -
फलटण शहरासह कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी व ठाकुरकी या उपनगरांमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वारंवार वीज जाण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून विविध कारणे सांगून शहर व उपनगरांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची तक्रार वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे. दिवसा तसेच रात्रीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती ग्राहकांसह व्यापारी व व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने दुकाने, लघुउद्योग व इतर व्यवसायिकांचे कामकाज ठप्प होत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.
शहराच्या फीडरवर काही ग्रामीण भाग जोडण्यात आल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत वीज वितरण कंपनीकडे विचारणा केली असता कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची नाराजी वीज ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
फलटण शहर व उपनगरांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










