फलटण ( सचिन मोरे )
255 (अ.जा. )फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून मातंग उमेदवार नाहीच ? हे लिहिताना खरे तर दुःख होतय. त्याला कारणही तसेच आहे, मातंग समाजाला नेहमीच राजकीयसत्ते पासून वंचित ठेवण्याच काम प्रस्थापित राजकीय पक्षाने केलेचे वेगळे सांगायची गरज नाही. लोकसंख्येने उठून दिसणारे तरीही कायम दुर्लक्षित समाज असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राजकीय नेत्यांचे खरे रूप आता मातंग नेत्यांसमोर आले आहे हे खेदाणे नमूद करावेसे वाटत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीने फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून मातंग समाजातील उमेदवार दिला आहे. त्यामुळे समाजाला आता आपले अस्तित्वपणाला लावून ताकत दाखवून द्यावी लागणार आहे.
फलटण -कोरेगाव मतदार संघात जवळपास विस हजाराहून जास्त मतदान मातंग समाजाचे आहे. मात्र समाज्याच्या मतांचे राजकारण करण्याचे काम नेहमीच झाले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणूकीतही समाजाच्या केवळ मतांचा वापर केला जातो. मात्र त्याबदल्यात योग्य प्रतिनिधित्व मात्र दिले जात नाही अशी खंत समाज बांधव बोलून दाखवतात. अनुसूचित जाती मधील फलटण तालुक्यातील दोन नंबरची मतदार संख्या असूनही मातंग समाजाला उमेदवारी पासून प्रस्थापित पक्षांनी डावलले आहे त्यामुळे आता लवकरच राजकीय भूमिका समाजाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे प्रमुख नेते मंडळी बोलत आहेत. बोटावर मोजण्या एव्हढे मतदार असणाऱ्या समाजाला विधानसभेची संधी दिली जाते हे शल्य समाजाला टोचते आहे अशी भावना समाज बांधव बोलून दाखवतात. त्यामुळे आता समाजातून रोष निर्माण होऊ लागला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने मातंग समाजाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता समाजाकडून आपल्या मतांची किंमत दाखवण्याची वेळ आली असल्याचे समाज बांधव सांगत आहेत.
फलटण येथे लवकरच समाज बांधवांची चर्चा सत्र होणार असून विधानसभेसाठी मोठा निर्णय होण्याची चर्चा सध्या सुरु आहे.