फलटण प्रतिनीधी:- सध्या संपूर्ण फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीबाबत धक्कादायक माहिती पुढे आली असून शेकडो कोटीचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीने या ठिकाणी उभा केलेल्या सिमेंट काँक्रीट आरएमसी प्लांट व कामगार वसाहतीला महवितरण साखरवाडी शाखेच्या शाखा अभियंता यांच्या मेहरबानीने लाखों रुपयांची चक्क चोरून वीज वापरत असल्याचे उघड झाले आहे.
अशोका इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीने अस्तरीकरणाचे बारा किलोमीटरचा ठेका घेतला आहे यासाठी कंपनीने तडवळे ता फलटण येथे कामगार वसाहत व आर एम सी प्लांट ची उभारणी केली आहे मात्र याठिकाणी कंपनीने महवितरण साखरवाडी शाखेच्या शाखा अभियंता अमोल चांगण यांच्या मदतीने चक्क आकडा टाकून वीज वापर सुरू केला असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
वास्तविक महावितरण वीज चोरी रोखण्यासाठी विविध भरारी पथके नेमून कृषी पंपाचे व घरगुती वीज चोरी करणाऱ्यांना शोधून काढत असते व लाखो रुपयांचा दंड करत असते मात्र या ठिकाणी भर रस्त्यावरच एवढ्या मोठ्या कंपनीने लाखों रुपयांची केलेली वीज चोरी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कशी काय निदर्शनास आली नाही असा संतप्त सवाल या परिसरातील शेतकरी व नागरिकांना पडला आहे.
महवितरण साखरवाडी शाखेत काही दिवसांपूर्वीच बदलीने हजर झालेल्या शाखा अभियंता अमोल चांगण यांनी आल्या आल्याचं त्यांचा कारभार दाखवण्यास सुरुवात केली असून नियमानुसार शाखा अभियंता अमोल चांगन यांना कार्यक्षेत्रातच राहण्याचे महावितरणचे आदेश असताना तालुक्याच्या बाहेर राहत आहेत.अनेक ठिकाणी होत असलेल्या वीज चोरीकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक शेती वीज जोडण्याना विनाकारण अनेक कारणे देत जोडनी देत नाहीत अशा अनेक तक्रारी शाखा अभियंतांचे विरोधात येत आहेत.
एकीकडे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा उजवा कालवा अस्तरीकरणास विरोध केला असून दूसरीकडे सदरचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने तडवळे ता फलटण येथे कामगार वसाहत व आर.एम.सी प्लांट करीता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लाखोंची वीजचोरी सुरू असून दिवसा ढवळ्या व रात्री हा प्रकार राजरोजपणे सुरू केला आहे.
गोर गरीब शेतकरी वर्गाची कामे करताना विविध नियम व अटी सांगणाऱ्या साखरवाडी शाखा अभियंता यांना लाखोंची वीज चोरी कशी दिसत नाही असा सवाल शेतकरी विचारत असून लाखोंचे वीज चोरीचे बिल अस्तरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी सोबत साखरवाडी शाखा अभियंता यांच्याकडून वसूल करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.