फलटण प्रतिनिधी :
फलटण तालुक्यात मटका व्यावसाय जोमात सुरु असून मटक्याच्या अधीन गेलेल्या तरुणांचे संसार कोमात गेल्याचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. पोलिसांच्या छत्रछायेखाली अवैध व्यावसायाने जोर धरला असून चौका-चौकात खुलेआम मटक्याचा बाजार सुरु आहे. पोलिसांबरोबर अवैध व्यावसायिकांचे जाळे किती घट्ट जुळलेले आहे याचा प्रत्यय येथे येतो. या व्यावसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून पोलिसांकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात मजुरांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यात तरुणांचीच संख्या जास्त आहे.
मात्र बहुतेक तरुण झटपट पैसे कमावण्याच्या नादात या खेळाच्या अधीन गेले असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर काहींचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अनेक तरुण हारजीतीच्या तणावाने इतरही व्यसनाच्या आहारी गेले आहेत. मटका चालवणारांना पोलिसांच्या आशीर्वादाने व्यवसाय मिळाला असला तरी या व्यवसायाच्या नादी लागलेले इतर व्यावसायिक मात्र बरबाद झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मटक्याच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या तरुणांच्या घरातील सदस्य मात्र चिंताग्रस्त आहे. मटका या जुगाराचे अल्पवयीन मुलांना मोठ्याप्रमाणात व्यसन जडले आहे. ऐन शिकण्याच्या वयात ही मुले मटका जुगाराच्या नादी लागल्याने अनेकांचे भवितव्य अंधातरी झाल्याचे जाणवते. मटका जुगाराच्या हारजीतीमुळे अनेक तरुणांना दारुचे व्यसन जडले असल्याने घरातील दररोज होत असलेल्या वादावादीमुळे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहे.
फलटण शहत सध्या अवैध व्यावसायासाठी प्रसिद्ध होत चालले आहे. त्यामुळे बाहेरगावचे जुगार शौकिन लोकही कामधंदा न करता येथे येऊन दिवस दिवस बसत असतात. पोलिसांचा कायमच येथील अवैध व्यवसायाला वरदहस्त राहिल्याने अवैध व्यावसायिकांची मुजोरी सुरु असते. अलिकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मटका जुगारासाठी केला जातो. मटका व्यवसायाला सोशल मिडीयामुळे चांगलेच बळ मिळाले असून पोलिसांपुढे हा व्यवसाय मोडीत काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सोशलच्या माध्यमातूनच मटका जुगाराचा खेळ खेळला जातो. तसेच अर्थिक व्यावहारही ऑनलाईनच होत असल्याने छुपे रुस्तुमांची संख्या वाढली आहे. यामुळे तरुणपिढी पूर्णपणे वाया जात असून खरंच पोलीस आपले अवैध व्यावसायिकांशी असलेले हितसंबध बाजूला ठेऊन हा अवैध व्यवसाय बंद होण्यासंबधी कारवाई करतील काय? की पहिले पाढे पंचावन्न चालू ठेवत आपल्या अकार्यक्षमतेचे दर्शन घडवतील, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.