सातारा दि.25 : एक देश एक रेशन कार्ड (ONORC) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीद्वारे कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून आधार Authentication करुन धान्य उचलण्याची सेाय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी स्थलांतरण करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
अनुज्ञेय असलेले अन्नधान्य प्राप्त करुन घेण्याची सुविधा पोर्टेबिलिटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या करिता लाभार्थ्यांनी सद्यस्थितीत असलेल्या शिधापत्रिकांवरील 12 अंकी क्रमांकाचा वापर करुन आधार प्रमाणिकरणाद्वारे धान्य वितरीत करण्यात येते. ई-पॉस मशीनवर बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतरच लाभार्थ्याला एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणारे सर्व लाभार्थी एक देश एक शिधापत्रिका योजनेसाठी पात्रत आहेत. (ज्या रास्तभाव दुकानांमध्ये मानवी पद्धतीने धान्य वाटप करण्यात येते, त्या रास्तभाव दुकानातील लाभार्थी व राज्य योजनेतील लाभार्थी एक देश एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील.)
शिधापत्रिकेतील कमीत कमी एक लाभार्थ्याचा आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न असावा. लाभार्थ्याकडे एक पेक्षा अधिक शिधापत्रिका नसावी. (लाभार्थ्याचे नाव इतर शिधापत्रिकांमध्ये समाविष्ट असल्यास असा लाभार्थी या योनजेसाठी पात्र नसेल). शिधापत्रिकेतील एकही लाभार्थ्याचे इतर दुसऱ्या शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट नसावे.
राष्ट्रीय पोर्ट्रेबिलीटी अंतर्गत ज्या शिधापत्रिकेमध्ये एक सदस्य आहे, ती शिधापत्रिका वगळून इतर शिधापत्रिकेमधील काही सदस्य स्वगृही राज्यात वास्तव्यास असतील तेव्हा लाभार्थी अशा शिधापत्रिकेवर अनुज्ञेय संपूर्ण अन्नधान्य गंतव्य राज्यातील रास्तभाव दुकानामधून एकाच व्यवहारात उचल करु शकत नाही. ही सुविधा स्वगृही राज्यातील शिधापत्रिकेतील इतर सदस्यांनाही अन्नधान्याचा लाभ मिळावा याकरिता करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय पोर्टेबिलीटी अंतर्गत ज्या शिधापत्रिकेमध्ये एकपेक्षा जास्त सदस्य आहेत, अशा शिधापत्रिकेवर लाभार्थी एका व्यवहारामध्ये अनुज्ञेय अन्नधान्याचा 50 टक्के अन्नधान्य उचल करु श्काता, तथापी दोन अन्नधान्य उचलीच्या व्यवहारांमध्ये 7 दिवसांचे अंतर असावे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती राजमाने यांनी कळविले आहे.