वाकेश्वर (ता. खटाव) येथील माजी सैनिक उमेश चंद्रकांत फडतरे यांनी गाव परिसरासाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे.
वाकेश्वर (ता. खटाव) येथील माजी सैनिक उमेश चंद्रकांत फडतरे यांनी गाव परिसरासाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे.
वाकेश्वर हे अंदाजे 2 हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावासाठी येरळा नदीपात्र व दरजाई तलाव अशा दोन पाणीपुरवठा योजना आहेत. या योजनांचे पाणी वर्षातील काही महिने पूर्ण क्षमतेने मिळते. उन्हाळ्याच्या काही दिवसात पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्याचबरोबर पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे चवही बदलते. अशा परिस्थितीत अपुर्या पाण्यामुळे काही वेळेला तक्रारीही निर्माण होतात. त्यामुळे लोकांना बारमाही चांगले शुद्ध पाणी मिळावे याकरिता फडतरे यांनी वडूज रस्त्यावर खालचा मळा येथील राहत्या घरानजीक ‘सृष्टी अॅक्वा’ या नावाने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे.
फडतरे हे सुभेदार मेजर पदावरून गेल्या वर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. गावच्या भल्यासाठी काहीतरी करावे या भावनेने त्यांनी सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक करून हा प्रोजेक्ट उभारला आहे. त्यांच्या मातोश्री सरुताई फडतरे, ज्येष्ठ बंधू निवृत्त गावकामगार तलाठी राजाराम फडतरे यांच्या हस्ते नुकतेच या प्रोजेक्टचे उद्घाटन करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर निवडक महिलांच्या उपस्थितीत पूजन करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
फडतरे यांच्या या योजनेचे परिसरात कौतुक होत आहे.