फलटण प्रतिनिधी :- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अगदी काही दिवसांवर आला असताना शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गा अतिशय खराब झाला होता या आशयाची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर फलटण पालिका व प्रशासनाने त्वरित दखल घेत पालखी मार्गावर पडलेले खड्डे खडीकरण डांबरीकरण करून भरून घेतले आहेत.
मलटण येथून पालखी सद्गुरु पथ-स्वामी समर्थ चौक- उंबरेश्वर चौक पुढे महादेव मंदिर हरिबुवा मंदिर - बाणगंगा नदी - पाचबत्ती चौक ते विमानतळ असा फलटण शहरातील अंतर्गत पालखी मार्ग आहे. भुयारी गटर योजना व इतर कामांमुळे हा पालखी मार्ग अतिशय खराब झालेला होता. या रस्त्यावरून पायी चालत जाणे सुद्धा मुश्किल झाले होते. दुचाकी चारचाकी वाहनांचे रोजच छोटे मोठे अपघात होत होते अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावरील खड्यात पडून गंभीर दुखापत ग्रस्त झाले होते. वास्तविक फलटण मध्ये येण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने या मार्गावरून प्रचंड वाहतूक असते तरी देखील गेली वर्षेभर नागरिक याच खड्डेमय रस्त्यातून ये जा करीत होते.
पालखी सोहळा काही दिवसांवर आला असताना धैर्य टाईम्सने समस्येची दखल घेत वृत्त प्रसिद्ध करताच पालिका व प्रशासन ही खडबडून जागे झाल्याचे दिसले काही तासातच पाचबत्ती चौक येथील खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली व आज सलग दुसऱ्या दिवशी उंबरेश्वर चौक ,स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती सुरू होती.